कारवाईच्या भीतीने शेतकरी भयभीत
| सुधागड पाली | वार्ताहर |
भोयराचा नवघर येथे वास्तव्यास असलेल्या शेतकर्याच्या कळंब येथील जमिनीतून माती चोरी झाल्याची घटना घडली आहे. या संबंधात शेतकर्याने तहसीलदारांकडे तक्रार केली असून त्याची प्रत पोलिस दूरक्षेत्र जांभूळपाडा व तलाठी यांच्याकडे केली आहे.
सातबारा क्रमांक 2 व 3/2 ब या कळंब येथील जमिनीतून माती उत्खनन केल्याची घटना नुकतीच घडली आहे. शेतकरी हा इतर ठिकाणी रहात असल्याने उत्खनन झाल्याची त्याला कल्पना नव्हती. शेतजमिनीला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर, तेथील परिस्थिती पाहता शेतकर्याला मानसिक धक्का बसला असून महसूल विभागाकडून आपल्यावर कारवाई होईल या भितीने त्याची घाबरगुंडी उडाली आहे.
सुधागड तालुक्यात शेतघराच्या नावाखाली बंगल्याच्या कामे जोरदार सुरू आहेत. सुधागड तालुक्यात सर्रास महसूल कर बुडून मातीचे भराव कामे सुरू आहे. कळंब येथील शेतकर्यांच्या शेतातील माती देखील आजूबाजूला सुरू असणार्या विकास कामांच्या भरावासाठी वापरण्यात आले असल्याचे शक्यता नाकारता येऊ शकत नाही.
माझ्या शेत जमिनीला भेट दिली असता सदर जमिनीतून मातीचे उत्खनन झाल्याचे आढळले. हे उत्खनन कोणी केले? तसेच उत्खनन केलेली माती,मुरूम कोठे टाकला याची चौकशी व्हावी. तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हावी.
दत्ता तळेकर, कलंब