सात्विक ऊर्जाकडून तत्काळ कार्यवाही
| नेरळ | प्रतिनिधी |
मोगरज ग्रामपंचायतीमधील शेतकऱ्यांचा सौर ऊर्जेवरील शेती पंप अवघ्या चार दिवसात बंद पाडण्यात आला होता. त्याविरुद्ध संबंधित शेतकऱ्यांने माध्यमांना बोलावून घेत सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणली आणि त्यानंतर दोनच दिवसांनी 25 दिवस बंद असलेला विजेचा सौर पंप सुरू करण्याची कार्यवाही झाली.
मोगरज ग्रामपंचायतीमधील पिंपळपाडा गावातील मारुती धुळे यांनी माळरानावर बाग फुलवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी वीज पोहचली नसल्याने महावितरण कंपनीचे सल्ल्याने तेथे सौर ऊर्जेद्वारे वीज नेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महावितरण कंपनीच्या कर्जत येथील कार्यालयातून सौर ऊर्जेद्वारे विजेचा पर्याय निवडला आणि अर्ज केला. महावितरण कंपनीकडे नागपूर येथील सात्विक वीज कंपनीचे करार असून, त्यातून मारुती धुळे या शेतकऱ्याच्या शेतात सौर ऊर्जा संच बसवण्याचा निर्णय झाला.
जानेवारी महिन्यात कागदपत्रांची पूर्तता केल्यावर एक मार्च रोजी सर्व यंत्रणा बसवण्यात आली आणि सौर ऊर्जेचे माध्यमातून तेथे वीज निर्माण झाली. त्यातून तेथील कूपनलिकेतून पाण्याचा पुरवठादेखील सुरू झाला. मात्र, चार दिवसांनी सात्विक वीज कंपनीच्या मुरबाड ठाणे येथे कार्यालय असलेल्या कर्मचाऱ्याने ऑनलाईन पद्धतीने मारुती धुळे यांच्या शेतातील सौर ऊर्जा पंप बंद करून टाकले. सात्विक वीज कंपनीकडे येर-झाऱ्या मारण्यास सुरुवात झाली. त्यातून कोणताही मार्ग निघत नव्हता आणि त्यामुळे महावितरण कार्यालयात जाऊन बसून तेथे असलेल्या अधिकारी वर्गाला मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न करू लागले. सतत 15 दिवस शेतकरी मारुती धुळे हे कशेळे येथून एसटी पकडून कर्जत येथे जात आणि तेथे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटत होते.
पिंपळपाडा येथे असलेल्या जमिनीवर लावलेली झाडे सुकू लागल्याने धुळे यांनी माध्यमांचे प्रतिनिधी यांना आपल्या शेतावर बोलावून घेत हा प्रकार त्यांच्या कानावर घातला. तेथून माध्यम प्रतिनिधींनी प्रत्यक्ष सात्विक वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला पण काही ही हालचाली होत नव्हत्या. शेवटी शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे यांची पाण्या अभावी झालेली सत्य स्थिती पाहून वृत्तपत्रात याबाबत सचित्र बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर अवघ्या तीन दिवसात सात्विक कंपनीचा मुरबाड येथे बसणारा अधिकारी आपल्या लवाजमा सह पिंपळपाडा येथे पोहोचला. हाच अधिकारी शेतकरी धुळे तसेच अनेकांचे फोन देखील स्वीकारत नव्हता. मात्र, माध्यमांनी आवाज उठवल्यावर तत्काळ सात्विक वीज कंपनीकडून सौर ऊर्जा यंत्र कार्यान्वित करण्याची कार्यवाही झाली. सात्विक ऊर्जा कडून ऑनलाइन पद्धतीने हे यंत्र बंद करण्यात आले होते. मात्र, तब्बल 25 दिवसांनी पंप सुरू झाल्याने मारुती धुळे यांनी माध्यमांचे आभार मानले आहेत. त्याचवेळी शेतकरी धुळे यांनी आपली सुकलेले झाडे पुन्हा जिवंत करण्यासाठी पाणी पंपाद्वारे उचलण्यास सुरुवात केली आहे.
