‘गणरायासाठी सज्ज रायगड’ अभियानांतर्गत विशेष उपक्रम

स्वच्छता, आरोग्य आणि डेंग्यू प्रतिबंधावर भर देणार

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेकडून गणरायासाठी सज्ज रायगड अभियानांतर्गत निरोगी व स्वच्छ गणेशोत्सव हा उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 14 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात गावातील रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, अंगणवाडी, मंदिर परिसर तसेच गणेश मंडप परिसराची विशेष स्वच्छता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नाले व गटारे स्वच्छ करून पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा तातडीने उचलून योग्य विल्हेवाट लावण्यास सांगण्यात आले आहे. डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्याचेही निर्देश आहेत. घरांच्या व सार्वजनिक परिसरातील पाणी साचणारी ठिकाणे शोधून ती तातडीने हटवावीत. टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकच्या वस्तू, डबे, कुंड्या आदींमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान गणेश विसर्जन घाटांची पूर्वपाहणी करून स्वच्छता व दुरुस्तीची कामे उत्सवापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घाटावरील गाळ, झुडपे व कचरा हटविणे, घाटाकडे जाणारे रस्ते व पायवाटा सुस्थितीत करणे, आवश्यक ठिकाणी प्रकाशयोजना, बॅरिकेडिंग आणि मार्गदर्शक फलक लावण्याचे निर्देश आहेत. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याबरोबरच नदी, तलाव व जलाशयांमध्ये निर्माल्य टाकले जाणार नाही, यासाठी स्वतंत्र निर्माल्य संकलन व्यवस्था करण्याचेही सांगण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत भाविकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आली आहे. पाण्याच्या टाक्या, नळयोजना व जलसाठ्यांची स्वच्छता करून पर्यायी पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. डेंग्यूची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी आणि गणेश मंडळांच्या ठिकाणी माहितीपत्रके व फलक लावण्यात येणार आहेत. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून घरभेटी घेऊन जनजागृती करण्याचे निर्देश आहेत. प्रत्येक पंचायत समिती स्तरावर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या सहभागातून संयुक्त बैठका घेऊन गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावरील कार्यवाहीची नोंद ठेवून छायाचित्रांसह अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

Exit mobile version