| नाशिक | वृत्तसंस्था |
मुंबई-आग्रा महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या मार्गावरील चांदवडमधील राहुड घाटामध्ये सकाळी साडेनऊच्या सुमारास जळगावहून वसईला जाणाऱ्या एसटी बसला हा अपघात झाला. या अपघातामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा मार्गावर हा अपघात घडला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 45 प्रवासी होते. भरधाव वेगात असलेल्या या एसटी बसच्या पुढील बाजूला डावीकडे ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे बसवरील ताबा सुटून अनेकजण बाहेर फेकले गेले, तसेच बसच्या खिडक्यांवर आदळले. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 प्रवासी दगावले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी, तसेच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. या मार्गावरुन जाणाऱ्या इतर वाहनांमधील प्रवाशांपैकी काहींनी पुढाकार घेऊन अपघातग्रस्त बसच्या सांगाड्यावर चढून अडकलेल्या प्रवाशांना एक-एक करुन बाहेर काढले. मतदकार्य पोहचण्याआधीच या प्रवाशांनी केलेल्या मदतीमुळे बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढता आले. अपघातानंतर बस डिव्हाडरला आदळून थांबल्याचे घटनास्थळावरील परिस्थितीवरुन स्पष्ट होत आहे. या अपघातात जखमी झालेल्या 17 प्रवाशांना जवळच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात नेमका कसा घडला? यासाठी कोण कारणीभूत आहे, याचा सखोल तपास सुरु आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती समोर येत असून सध्या ही अपघातग्रस्त बस या मार्गावरुन बाजूला काढण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पोलीस उपस्थित असून मदतकार्य सुरु आहे.