हमरापूर फाट्यावर एस.टी.बसेस थांबाव्यात: मोहन पाटील

। हमरापूर । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील हमरापूर फाटा येथे सर्व एस.टी. बसेस थांबाव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोहन पाटील यांनी एस.टी. महामंडळाचे रायगड विभाग नियंत्रक दिपक घोडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

पेण हे तालुक्याचे ठिकाण असून पेणपासून मुंबईकडे जाणार्‍या एस.टी. बसच्या मार्गावर हमरापूर हे गाव आहे. या विभागातून नागरिक, विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात पनवेल, मुंबई येथे नोकरी व शिक्षणाकरीता दररोज प्रवास करीत असतात. परंतू मुंबईकडे जाणार्‍या एस.टी. बसला हमरापूर फाट्यावर थांबा नसल्यामुळे केवळ लोकल एस.टी. बसेस व अन्य वाहनांवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना वेळेवर पोहचण्याकरीता नाहक अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागतो.

या आधीही पत्राद्वारे कळविले होते. त्याप्रमाणे गाडयादेखील हमरापूर फाट्यावर थांबत होत्या. परंतू गेल्या 2 वर्षापासून गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे गावातील नागरीकांना व विद्यार्थ्यांना अत्यंत त्रासाला सामारे जावे लागत आहे. हमरापूर फाट्यावर पनवेल, मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव व इतर ठिकाणी जाणार्‍या सर्व एस.टी. बसेसना थांबा देऊन सहकार्य करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version