। मुंबई । प्रतिनिधी ।
नाशिक जिल्ह्यातील बेगू सावरपाडा येथील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी नदी पात्रातून सुमारे 2 ते 3 कि.मी.चा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. यासाठी शासनाने तातडीने तेथे पूल बांधावा, अशी मागणी शेकाप आ. जयंत पाटील यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे सरकारकडे केली आहे.
बेगु सावरपाड्यातील विद्यार्थ्यांंना शिक्षण घेण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रस्ता नसल्याने चक्क विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी तसेच रुग्ण व गरोदर महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी पूराच्या पाण्यातून टायरच्या सहाय्याने प्रवास करावा लागत आहे. पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांना दळणवळण करण्यासाठी पूराच्या पाण्यातून वाट शोधत कसरत करावी लागत आहे.
नदीवर पूल नसल्याने कळमणे, बेगु सावरपाडा, मदळपाडा, खीरमाणी आदी गावांतील नागरिकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तरी राज्य शासनाने याची योग्य दखल घेवून त्याठिकाणी तात्काळ पूल बांधण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी केली आहे.