10 लाख विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याचा धोका
| रायगड | प्रतिनिधी |
शालेय शिक्षण विभागाच्या यू डायस-प्लसवरील विद्यार्थी नोंदणीतील वास्तव पुढे आले असून यू डायस प्लस पोर्टलवरील माहितीनुसार, राज्यातील 2 कोटी 14 लाख विद्यार्थ्यांपैकी 5 लाख 78 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरल्याने, शिक्षणहक्क कायद्याशी विसंगत अशी स्थिती निर्माण झाली आहे. धक्कादायक म्हणजे, राज्यात 10 लाख 77 हजार विद्यार्थी शाळेत असूनही शाळाबाह्य ठरण्याचा धोका निर्माण झाला असून विद्यार्थी आधार कार्ड अद्ययावतीकरणाच्या गोंधळात शिक्षणाचा बळी जाऊ नये, विद्यार्थी आधार कार्ड अद्ययावत (अपडेट) करण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय बालक, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षण प्रशिक्षण संस्था अध्यापक भारतीने महाराष्ट्र शासन तथा शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन संचमान्यता करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची आधारकार्डच्या आधारे नोंदणी करण्यात येत आहे. आधार कार्ड नसल्याने राज्यातील 4 लाख 98 हजार 759 विद्यार्थी शाळाबाह्य ठरले असताना आता आधार कार्ड वैधतेविना 5 लाख 78 हजार 433 विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. राज्यातील 10 लाख 77 हजार 192 विद्यार्थी शाळेत असूनही पटसंख्येवरून गायब होणार असल्याने त्यांच्यावर शाळाबाह्य ठरण्याचा ठपका बसणार आहे. तसेच अद्याप 70 हजार विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाची वैधता तपासण्याचे काम सुरू असून, शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदणी यू डायस प्लस या पोर्टलवर समाविष्ट करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. विद्यार्थ्यांची यू डायसवरील नोंदणी आधार कार्डच्या आधारे करण्यात येत आहे. या नोंदणीच्या आधाराने संचमान्यता ठरवून शिक्षकांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. यू डायसवर 20 ऑक्टोबरपर्यंत झालेल्या नोंदणीच्या आकडेवारीनुसार राज्यातील 2 कोटी 14 लाख 68 हजार 288 विद्यार्थ्यांपैकी 2 कोटी 9 लाख 69 हजार 529 विद्यार्थ्यांनीच आधार कार्ड सादर केले आहे.
आधार कार्ड सादर केलेल्या विद्यार्थ्यांपैकी यू डायस पोर्टलवरील तपासणीत 2 कोटी 3 लाख 21 हजार 408 विद्यार्थ्यांची आधार कार्ड वैध ठरली आहे. तर 5 लाख 78 हजार 433 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरले आहे. तसेच 69 हजार 688 विद्यार्थ्यांची आधार कार्ड तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. यावरून आधार कार्ड नसलेले 4 लाख 98 हजार 759 विद्यार्थी आधीच शाळाबाह्य ठरले होते. त्यात आता आधार कार्ड अवैध ठरलेल्या 5 लाख 78 हजार 433 विद्यार्थ्यांची भर पडल्याने राज्यातील सुमारे 10 लाख 77 हजार 192 विद्यार्थी शाळाबाह्य ठरणार आहेत.
विद्यार्थी आधारकार्ड अपडेटचा गोंधळ
