| अलिबाग | प्रतिनिधी |
पेढांबे येथील समाज मंदिरात आगरी सामाजिक संस्था, अलिबागच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा शनिवारी (दि.20) अलिबागच्या प्रभारी नगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद जोमा पाटील यांनी भूषविले होते. संस्थाध्यक्ष कैलास पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, सुहास पाटील, रसिका पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
या सोहळ्यात मार्गदर्शन करताना प्रभारी नगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे म्हणाल्या की, आगरी समाजातील विद्यार्थी कोणत्याही अडथळ्यांना न डगमगता जिद्दीने मात करतील आणि भविष्यात यशाची मोठी शिखरे सर करून समाजाची मान उंचावतील असे सांगून परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
अलिबाग तालुक्यातील आगरी समाजातील गुणवंत विद्यार्थी हर्षिता पाटील, स्वरूप पाटील, आर्या भगत, सानवी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अलिबाग तालुक्यातील हायस्कूलमधील परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्यांना गौरवण्यात आले. तसेच नौदलात नियुक्ती झालेले प्रज्ञेश पाटील, महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेले मंगेश ठाकूर, न्यायाधीश पदी निवड झालेले सन्मान पाटील आणि उत्कृष्ट सामाजिक कार्य करणारे रवींद्र पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील म्हात्रे, संदेश पाटील, रेखा मोकल, वनिता पिंगळे, अपर्णा म्हात्रे, सुवर्णा भगत, जयश्री म्हात्रे, रेशमा पिंगळे, मेघना पाटील, रंजना म्हात्रे, सुभाष म्हात्रे, पांडुरंग मानकर, प्रमोद पाटील, सतीश म्हात्रे, विश्वनाथ पाटील, बबन पाटील, सिद्धेश पाटील, प्रकाश मिसाळ, संदेश पिंगळे, मनोज उदय पाटील आणि चंद्रकांत म्हात्रे यांनी परिश्रम घेतले.







