तब्बल 120 पायऱ्यांची चढ-उतार; पादचारी पुलाची उंची वाढवल्याने दमछाक
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल रेल्वे स्थानकात सध्या लाखो लोकल प्रवाशांना एका अजब आणि त्रासदायक समस्येचा सामना करावा लागत आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरअंतर्गत दुमजली कंटेनर मालवाहू गाड्यांच्या सुलभ वाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाने पनवेल स्थानकातील नवीन पादचारी पुलाची उंची वाढवली आहे. रेल्वेचा हा तांत्रिक निर्णय मालवाहू गाड्यांसाठी फायदेशीर ठरला असला, तरी सर्वसामान्य प्रवाशांसाठी मात्र तो डोकेदुखी ठरला आहे. या वाढीव उंचीमुळे प्रवाशांना आता स्थानकात ये-जा करण्यासाठी चक्क 120 पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या आणि उतराव्या लागत आहेत. त्यामुळे पनवेलकरांना दमकोंडी प्रवासाला सामोरे जावे लागत आहे.
सध्या पनवेल रेल्वे स्थानक हे विविध समस्यांच्या गर्तेत अडकलेले आहे. या रेल्वे स्थानकात विविध विकास कामे सुरू आहेत. परंतु, त्याचा प्रचंड फटका या रेल्वेस्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला बसत आहे. त्यातच डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरअंतर्गत दुमजली कंटेनर मालवाहू गाड्यांच्या सुलभ वाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाने पनवेल स्थानकातील नवीन पादचारी पुलाची उंची वाढवली आहे. रेल्वेचा हा तांत्रिक निर्णय मालवाहू गाड्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. परंतु, सर्वसामान्य प्रवाशांसाठी मात्र तो डोकेदुखी ठरत आहे. या वाढीव उंचीमुळे प्रवाशांना आता स्थानकात ये-जा करण्यासाठी चक्क 120 पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या आणि उतराव्या लागत आहेत. या डोंगराएवढ्या पायऱ्यांमुळे दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांची, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, गरोदर महिला आणि लहान मुलांची मोठी दमछाक होत आहे. अनेकांना धाप लागत असून, प्रवाशांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रवाशांचा हा वाढता त्रास पाहता, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे सल्लागार सुरेंद्र नेमळेकर यांनी या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे. स्थानकात ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांची होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी रेल्वेने युद्धपातळीवर सरकते जिने आणि अत्याधुनिक उद्वाहकाची व्यवस्था करावी, असे नेमळेकर यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते ॲड. संजय गांगुर्डे यांनी या समस्येवर कायमस्वरूपी आणि सोपा उपाय म्हणून स्थानक परिसरात भुयारी मार्ग सुरू करण्याची आग्रही मागणी केली आहे, जेणेकरून प्रवाशांना उंचीवर चढण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी प्रवाशांना दिलासा देणारे संकेत दिले आहेत. प्रवाशांना होणारा त्रास आणि संघटनांनी केलेल्या मागण्या रास्त असून, यावर मध्य रेल्वे प्रशासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. आता रेल्वे प्रशासन हे आश्वासन कधी पूर्ण करते आणि लाखो पनवेलकरांची या 120 पायऱ्यांच्या चक्रव्यूहातून कधी सुटका होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पनवेल रेल्वे स्थानकातील 120 पायऱ्यांचा पुल चढता-उतरताना लोकांची प्रचंड दमझाक होत आहे. हे पुल बांधताना रेल्वे प्रशासनाला सांगितले होते की, या पुलाऐवजी भुयारी मार्गाचे अपुर्ण काम पुर्ण करा. मात्र, तसे न करता आतापर्यंत दोन पुलांवर विनाकारण खर्च करण्यात आला. महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघातर्फे रेल्वे प्रशासनाला पत्र दिले होते. त्यात जो नव्याने पुल बनवला आहे तोच पुर्वेपासून पश्चिमेपर्यंत जोडा. परंतु, रेल्वे प्रशासनाने तसे केले नाही. त्यामुळे प्रवाशांना दोन्ही पुलावरील तब्बल 120 पायऱ्या चढ-उतार करत लाईन क्रॉस करून पलिकडे जावे लागत आहे. एखादा हृदय विकाराचा रुग्ण असेल, तर त्याला त्रास होऊ शकतो. याची काळजी रेल्वेने घेतली पाहिजे आणि या ठिकाणासह सर्वच फलाटांवर सरकते जिने बसविले पाहिजेत.
सुरेंद्र नेमळेकर,
सल्लागार, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ
मे 2014 पासून रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली होती की, पनवेल ते नवीन पनवेलचा भुयारी मार्ग चालू करा. परंतु, एका दगडाने वाट अडविल्याने रेल्वे प्रशासन तिकडे दुर्लक्ष करित आहे. आणि असे उंचच उंच पादचारी पूल बांधून रेल्वे प्रशासन प्रवाशांना त्रास देत आहे. रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचे जंक्शन असलेल्या पनवेल स्थानकातील प्रत्येक फलाटावर सरकते जिने बसविलेच पाहिजेत, अशी आमाची मुख्य मागणी आहे.
ॲड. संजय गांगनाईक,
सामाजिक कार्यकर्ते
