राज्यात उन्हाचा चटका

। पुणे । वृत्तसंस्था ।
राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसाने ओढ दिली असल्याने दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्वच विभागांमध्ये कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत वाढला आहे. काही ठिकाणी तो सरासरीपेक्षा 4 ते 5 अंश सेल्सिअसने वाढल्याने ऐन पावसाळ्यात चांगलाच उकाडा जाणवतो आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलका शिडकावा वगळता आठवडाभर पावसाची विश्रांती कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

ऑगस्टच्या सुरुवातीला बहुतांश भागात पाऊस थांबला असला, तरी काही दिवस अनेक ठिकाणी आकाश अंशत: किंवा सामान्यत: ढगाळ होते. त्यामुळे सर्वच ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या बरोबरीने 26 ते 28 अंशांपर्यंत होते. मोसमी पावसाचा पट्टा आता हिमालयाच्या पायथ्याशी सरकत आहे. परिणामी पावसाने ओढ दिली असून, अनेक भागांत दिवसभर निरभ्र आकाशाची स्थिती रहात आहे. त्यामुळे सूर्यकिरणे थेट जमिनीपर्यंत येत असल्याने तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार देशाच्या अनेक भागात 10 ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण कमी होणार आहे.कोकण विभागात मुंबईसह सर्वच ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत सुमारे 2 ते 3 अंशांनी वाढले आहे.

Exit mobile version