जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार हल्लाबोल
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
प्रशिक्षण सुरु असतानाही कोरोना काळात रुग्णसेवा करणार्या 15 अधिपरिचारिकांना प्रशिक्षण पूर्ण होऊन 12 हून अधिक महिन्यांचा कालावधी झाला आहे. त्यांना अजूनही 18 महिन्यांची नियुक्ती मिळाली नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे त्यांना 18 महिन्यांचे नियुक्तीचे आदेश देण्याची मागणी करत हल्लाबोल धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबत शासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात ऑगस्ट 2017 पासून जीएनएम प्रशिक्षणास 15 विद्यार्थ्यांनी सुरुवात करुन 2019-20 मध्ये आपले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. त्यानंतर उत्तीर्ण झालेल्या बंधपात्र अधिपरिचारिकांना संबंधित आरोग्य अधिकारी व कार्यालय येथे वारंवार भेट देऊन अर्ज-विनंत्या करुनसुद्धा नियमाप्रमाणे 18 महिन्यांचे नियुक्ती आदेश मिळत नाहीत. जिल्ह्याच्या मेरिटलिस्टमध्ये येऊन सदर प्रशिक्षणासाठी आमची निवड झाली आहे. मेहनत घेऊन अभ्यास करुन आम्ही उत्तीर्ण झालो आहेत. परंतु, आज आम्ही बेरोजगार आहोत. प्रशिक्षण चालू असतानासुद्धा कोरोना महामारीच्या आपत्तीतदेखील आम्ही रुग्णसेवेचे काम केले आहे. मात्र, आता नियुक्ती मिळत नसल्याने आम्ही आर्थिक व मानसिक तणावात आहोत. त्यामुळे नाईलाजाने आमच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 15 फेब्रुवारीपासून हल्लाबोल धरणे आंदोलन करण्याची वेळ ओढवली आहे. त्यामुळे आमच्या मागण्या शासनाने त्वरित पूर्ण करुन सदर आंदोलनाची वेळ आणू नये, असे आवाहन या परिचारिकांनी केले आहे.