अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा विजय

| मुंबई । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषकात ग्रुप ‘बी’ मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात ऍडलेडमध्ये सामना खेळला गेला. अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा बांगलादेशवर पाच धावांनी निसटता विजय झाला असून उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्‍चित केले आहे. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार धावांचे लक्ष हे 16 षटकात 151 करण्यात आले होते. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.

बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने 20 षटकांत 6 बाद 184 धावा केल्या. बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी 185 धावा करायच्या होत्या. धावांचा पाठलाग करताना लिटन दास याने तुफानी खेळी करत करत 27 चेंडूत 60 धावा केल्या. त्यामुळे एकवेळेस असे वाटत होते की, बांगलादेश सामना भारताच्या हातून काडून घेणार. पण पावसाने अडथळा आणला आणि तो भारतासाठी फायद्याचा ठरला. पाऊस थांबल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत सामन्यात परत आणले. दोलायमान असणार्‍या सामन्यात शेवटी भारताने पाच धावांनी जिंकला.

तत्पूर्वी, उपांत्य फेरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला अपयश आले. तो सुरुवातीपासूनच चाचपडत खेळताना दिसला. बाद होण्यापूर्वी त्याने 8 चेंडूवर 2 धावा केल्या. या विश्‍वचषकात आतापर्यंत शांत असलेल्या केएल राहुलने या सामन्यात तुफान कामगिरी केली. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेत 32 चेंडूवर 50 धावा केल्या. केएल राहुलने थोडा वेळ घेत नंतर मोठे फटके मारण्यास सुरुवात केली, त्याला विराट कोहली चांगली साथ मिळाली. राहुलने सलग तीन सामन्यातील अपयश धुवून काढत अर्धशतकी खेळी केली. मात्र अर्धशतकी खेळीनंतर शकिबने त्याला बाद केले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने 16 चेंडूत आक्रमक 30 धावांची खेळी करत आपले इरादे स्पष्ट केले होते.

शेवटच्या तीन षटकात बांगलादेशच्या गोलंदाजांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना केवळ अक्षर पटेलला बाद करण्यात यश आले. विराटने 19व्या षटकातील अखेरच्या दोन चेंडूंवर दहा धावा वसूल केल्या. रविचंद्रन अश्‍विननेही अखेरच्या षटकात एक चौकार व एक षटकार लगावला. भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 6 बाद 184 धावा केल्या. विराटने नाबाद 64 धावांची खेळी केली. बांगलादेशसाठी हसन मेहमूदने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

Exit mobile version