एसटीचे दहा हजार कर्मचारी निलंबित

मुंबई | वृत्तसंस्था |
एसटी संपात सहभागी झालेल्या 10 हजार 30 कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने बुधवारी रात्री जाहीर केली. याचबरोबर दोन हजार 14 रोजंदार कामगारांची सेवा समाप्त करण्यात आली.
एसटी कर्मचारी सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने तब्बल एक हजार 996 कर्मचार्‍यांची तडकाफडकी प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. राज्यातील 115 आगार पूर्णपणे, तर 135 आगार अंशतः बंद आहेत.
दरम्यान, मागील 43 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसह लाखो सवलतधारकांच्या खिशावर महागड्या प्रवासाचा भार पडत आहे. संपामुळे सवलतीसाठी आवश्यक स्मार्ट कार्ड नोंदणी-वितरण प्रक्रिया बंद आहे. नव्या वर्षात, अर्थात एक जानेवारीपासून हे कार्ड नसलेल्यांना सवलत मिळणार नाही. यामुळे ‘संप मिटेना, स्मार्ट कार्ड मिळेना,’ अशी सवलतधारकांची स्थिती झाली आहे. दरम्यान, तब्बल 30 दिवसांनंतर बुधवारी राज्य परिवहन महामंडळाच्या येवला आगारातून दोन बसेस येवला ते नाशिक मार्गावर धावल्या. संप करणार्‍या कर्मचार्‍यांपैकी तीन चालक आणि दोन वाहक बुधवारी कामावर हजर झाले.

Exit mobile version