शंभर रुपयांच्या रिचार्जसाठी 20 ते 50 रुपये अधिक वसुली
महिलांसह ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक?
| रायगड | प्रमोद जाधव |
एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी सुरू केलेल्या एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड योजनेतून प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येत असताना, कार्ड नोंदणी आणि रिचार्जच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम आकारली जात असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शंभर रुपयांच्या रिचार्जवर जीएसटीच्या नावाने पाच रुपये वजा होत असतानाच काही एजन्सींकडून 20 ते 50 रुपये अधिक वसूल केले जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
एसटी महामंडळाने कागदी ओळखपत्राच्या जागी 2016 मध्ये स्मार्ट कार्ड योजना सुरू केली होती. मात्र, अवघ्या सात वर्षांत ती योजना बंद पडली. त्यानंतर आता प्रवासातील पारदर्शकता वाढविणे, डिजिटल व्यवहारांना चालना देणे आणि एसटी प्रवास कॅशलेस करण्याच्या उद्देशाने एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) योजना सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून एसटी महामंडळाने तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा अधिक आधुनिक करण्याचा प्रयत्न केला आहे.
रायगड जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. या योजनेसाठी खासगी एजन्सींची नियुक्ती करण्यात आली असून, अलिबाग, पेण, कर्जत, उरण, पनवेल, महाड, श्रीवर्धन, मुरूड, रोहा आणि माणगाव या ठिकाणी सुमारे 30 हून अधिक एजन्सीमार्फत नोंदणीचे काम सुरू आहे. रायगड विभागाच्या अखत्यारित 24 एजन्सी कार्यरत असून, आठ आगारांतील 11 बसस्थानकांमध्ये या सुविधा उपलब्ध आहेत. काही एजन्सी सकाळी 8 ते 11, तर काही सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत कार्यरत आहेत.
महिलांच्या मोफत प्रवास योजनेमुळे एनसीएमसी कार्डसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. बसस्थानकांसह खासगी एजन्सींमध्ये नोंदणीसाठी महिलांच्या रांगा लागत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 40 हजार महिलांनी या कार्डसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी सुमारे 20 हजार लाभार्थ्यांना कार्डांचे वितरण करण्यात आले आहे. मात्र, कार्ड नोंदणीपासून ते प्रत्यक्ष कार्ड मिळेपर्यंत प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
या कार्डासाठी अधिकृत शुल्क 199 रुपये असताना अनेक ठिकाणी थेट 200 रुपये घेतले जात आहेत. त्यानंतर कार्ड सक्रिय करण्यासाठी शंभर रुपयांच्या रिचार्जवर 120 ते 150 रुपये आकारले जात असल्याची तक्रार आहे. यामध्ये शंभर रुपयांच्या रिचार्जमधून पाच रुपये जीएसटी म्हणून वजा केले जातात. त्यानंतर काही एजन्सींकडून 20 ते 50 रुपये अतिरिक्त घेतले जात असल्याने लाखो रुपयांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकाराकडे एसटी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन दोषी एजन्सींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
जुन्या योजनेचे हजारो कार्ड आजही धूळ खात
एसटी महामंडळाने 2016 मध्ये कागदी ओळखपत्राच्या जागी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली होती. अवघ्या 50 रुपयांत मिळणारे हे कार्ड प्रवाशांसाठी वापरण्यास सोयीचे ठरत होते. हजारो प्रवासी आणि विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. मात्र, आर्थिक कारणे पुढे करत संबंधित कंपनीने अवघ्या सात वर्षांत ही योजना बंद केली. परिणामी, जुन्या योजनेची हजारो स्मार्ट कार्डे आजही विविध एसटी बसस्थानकांमध्ये पडून असून, त्यांचा कोणताही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.
एनसीएमसी कार्ड योजना रायगड विभागात सुरू करण्यात आली असून, 24 हून अधिक एजन्सीमार्फत नोंदणीचे काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 40 हजार जणांनी नोंदणी केली असून, 20 हजार लाभार्थ्यांना कार्डांचे वितरण करण्यात आले आहे. एजन्सींना प्रवाशांकडून अतिरिक्त रक्कम आकारू नये, अशा तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही एजन्सी नियमबाह्य पद्धतीने जादा पैसे घेत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल.
– रोशन भोईर, एसटी महामंडळ, रायगड विभाग






