भीषण अपघात! कर्जतमधील पत्रकार गायकवाड यांच्यासह तिघांचा मृत्यू

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर मंगळवारी पहाटे इनोव्हा गाडीला अपघात झाला. या अपघातात इनोव्हा गाडीमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघांवर पनवेलमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नेरळ ग्रामपंचायतीचे सदस्य असलेले धर्मानंद गायकवाड हे नातेवाईक आणि मित्रांसह मुंबईतून आपल्या घरी नेरळ येथे एमएच-46-बीए-4261 या इनोव्हा गाडीमधून रात्री येत होते. पहाटे सव्वा तीन वाजता त्यांची गाडी कर्जत-कल्याण रस्त्याने नेरळकडे येत होती. त्यावेळी चालक धर्मानंद गायकवाड यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाच्या पुलावरून थेट खाली 30 फूट कोसळली. त्याचवेळी पनवेल येथून कर्जतकडे एक मालवाहू गाडी प्रवास करीत होती. त्यामुळे कोसळलेली गाडी थेट मालवाहू गाडीवर कोसळली. त्यात मालवाहू गाडीचे कपलिंग तुटले.


मालवाहू गाडी थांबली असल्याने कर्जत रेल्वे स्थानकातून माहिती मिळताच मध्य परिमंडळ रात्रगस्त कर्मचारी घटनास्थळी पोहचले. कर्जत रेल्वे स्थानक मास्तर कल्पेश देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनूसार रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी मालवाहू गाडीवर कोसळलेली इनोव्हा गाडी जेसीबीच्या मदतीने बाहेर काढून त्यातील पाच जणांना बाहेर काढले. जखमींना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी धर्मानंद गायकवाड (40), नितीन जाधव (35, रा. मुंबई), मंगेश जाधव (30, रा. ठाणे) हे मयत झाल्याचे जाहीर केले. तर नेरळ येथील पत्रकार जयवंत रामचंद्र हाबळे (43) व संतोष सखाराम जाधव (38) हे जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कामोठे येथे पाठविण्यात आले. संतोष जाधव यांच्यावर एमजीएम रुग्णालयात तर जयवंत हाबळे यांच्यावर पनवेल येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती कळताच कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, आरपोआय जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, युवक अध्यक्ष महाडिक आदींसह कर्जत आणि खालापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते हजर होते. शव विच्छेदन केल्यानंतर धर्मानंद गायकवाड, मंगेश जाधव, नितीन जाधव या तिघांवर नेरळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगेश जाधव आणि नितीन जाधव हे दोघे धर्मानंद गायकवाड यांचे मावस भाऊ आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा बळी या अपघाताने घेतला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पत्रकार आणि राजकारणी
धर्मानंद गायकवाड यांचे मूळ गाव कर्जत तालुक्यातील आसल हे असून त्यांनी नोकरी निमित्ताने नेरळ येथे राहण्यास सुरुवात केली. त्यांनतर नेरळ गावाचे रहिवासी झालेले धर्मानंद यांनी नेरळ ग्रामपंचायतची निवडणूक लढवली आणि विजय मिळविला. ग्रामपंचायत सदस्य म्हणून गेली चार वर्षे ते कार्यरत होते. त्याचवेळी आरपीआय आठवले गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून देखील ते जबाबदारी सांभाळत होते. तर पत्रकार म्हणून गेली 22 वर्षे वृत्तपत्रात काम करीत असून रायगड प्रेस क्लब या संघटनेत जिल्हा उपाध्यक्ष तसेच कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष या पदावर त्यांनी काम केले आहे.
Exit mobile version