| मुंबई | वृत्तसंस्था |
सन 2004 पासूनच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायचे होते पण त्याचा जुगाड लागत नव्हता. रामदास कदम, गजानन किर्तीकरांना हे माहिती आहे. जसे विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आले आणि लगेच त्यांनी सांगितलं की, आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहेत. महाशय टुमकन उडाले आणि त्या खुर्चीत जाऊन बसले. मागचे-पुढचे सगळे सोडले आणि मला म्हणाले मला कुठे व्हायचे होते. पवार साहेबांनी सांगितले. पण पवार साहेबांकडे दोन माणसे पाठवली तुम्ही आणि उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस करा म्हणून पवार साहेबांना विनंती केली हे कधी लपत नसते. असा खळबळजनक दावा यावेळी एकनाथ शिंदेंनी केला.
मी शिवसेना वाचवली. धनुष्यबाण तुम्ही गहाण ठेवला तो मी सोडवला. सरकार पडणार पडणार म्हणता, पण आता आम्हाला 210 आमदारांचा पाठिंबा आहे. आता तुम्ही म्हणता मुख्यमंत्री बदलणार, पण मला पदाची चिंता नाही. असे सांगून आझाद मैदानात आयोजित दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडून उपस्थितांना संबोधित केले.
बाळासाहेबांचे विचार हेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला. हिंदुत्वाची गद्दारी तुम्ही केली. खुर्चीसाठी तुम्ही किती गद्दारी केली. बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली. काँग्रेस, समाजवादींना तुम्ही डोक्यावर घेतले. उद्या एमआयएम आणि ओवेसीसोबत युती कराल. त्याशिवाय शिवसेना उद्या काँग्रेसमध्ये विलीन झाली तर आश्चर्य वाटायला नको, असेही ते म्हणाले.
मी सर्वसामान्य मराठा कुटुंबातील आहे. मला त्यांचे दुःख वेदना कळतात. मलाही त्यांची जाणीव आहे. आपली समिती, जस्टिस शिंदे यांची समिती अहोरात्र काम करतेय. पुनर्विचार याचिका दाखल करून घेतली आहे. एक एक खिडकी उघडी झाली आहे. कोणावरही अन्याय न करता कोणाचंही काढून न घेता, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार. या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार आहे असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, त्यांच्या समोर जाऊन नतमस्तक होतो, मी आपल्याला विनंती करतो की टोकाचं पाऊल उचलू नका. आत्महत्या करू नका, आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका. आपल्या मागे असलेल्या मुलाबाळांचा विचार करा. एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रीपद अडचणीत आणू. पण मला गोरगरिब जनतेपेक्षा हे मुख्यमंत्रीपद महत्त्वाचं नाही. म्हणून राज्यातील प्रत्येक समाज घटकाला आपल्याला पुढे न्यायचं आहे. त्यांना न्याय द्यायचा आहे. यासाठी आपल्याला डबल इंजिनचेसरकार आवश्यक आहे, असे शिंदे म्हणाले.
रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला. त्यांची बांधिलकी फक्त पैशांशी. त्यांनी कोणतीही सीमा ठेवली नाही. निर्लज्जपणाचा कळस गाठला. आपल्याला शिवसेना आणि धनुष्यबाण अधिकृतपणे दिल्यानंतर शिवेसनेच्या खाचत्यातील 50 कोटी रुपये बँकेकडे मागितले. बँकेने नकार दिला. बँक म्हणाली निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदेना दिली आहे. त्यांनी निर्लज्जपणे पत्र पाठवले. तुम्ही आमच्यावर 50 खोक्यांवर आरोप करता आणि 50 खोके आमच्याकडे मागता. या एकनाथ शिंदेंनी क्षणाचाही विलंब न लावता 50 कोटी द्यायला लावले. मी सांगितलं त्यांचे प्रेम बाळासाहेबांच्या विचारांवर नाही. याचा साक्षीदार माझ्यापेक्षा दुसरा कोण असू शकतो. योग्य वेळेला बोलेन असे शिंदे म्हणाले.