। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
नुकताच जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली असून, यामध्ये चिपळूण शहरात जुलैमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीची पुनरुक्ती होऊ नये, यासाठी नदीतील गाळ काढणे तसेच पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरलेली बेटे हटवणे याबाबत निर्णय प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली आहे.
नदीत इतक्या वर्षात 67 लाख घनमीटर इतका गाळ जमा झाला आहे. तो सर्व गाळ उपसून काढण्याचे काम पाटबंधारे विभागाने करावे, असे निर्देश जिल्हाधिकार्यांनी या बैठकीत दिले. यासाठीचे काम उपलब्ध निधीतून सध्या सुरू झाले आहे. मात्र अधिक निधी लागणार असल्याने त्याबाबत प्रस्ताव तत्काळ शासनास सादर करण्याची सूचनाही त्यांनी दिली.
नदीत गाळ साठण्यासोबतच नदी समुद्रास मिळते. त्या ठिकाणी नदीच्या प्रवाहात बेटांची निर्मितीझाली आहे. त्याचा प्रवाहाला अडथळा होत आहे तसेच नदीपात्रात वापर नसलेल्या दोन पुलांमुळे देखील पाणी अडते, असे दिसून आले आहे. नदीपात्रात बिनकामी असलेल्या पुलांना हटवण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावे, असेही निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून याला सुरवात झाली आहे.
शेतकर्यांसाठी हा नदीतला गाळ खूप लाभदायक आहे. त्यामुळे स्वत: वाहून नेण्याची तयारी असलेल्या शेतकर्यांना हा गाळ देण्याचे धोरण ठरवण्यात आले.नदीअंतर्गत वाहतूक शक्य व्हावी, यासाठी तयार झालेली बेटे काढण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच वैतरणी आणि वाशिष्ठीत गाळ काढल्याने नदीपात्र खोल होऊन नदीचे पाणी शहरात शिरण्याची शक्यता कमी होईल. नदीप्रवाह सुरळीत करण्यास प्राधान्य द्यावे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.