हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत प्रश्न मार्गी लावण्यासाठी अल्टिमेटम
। चिपळूण । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र शासनाने हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत पूरमुक्त चिपळूणसाठी वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी सर्व यंत्रसामग्रीनिशी सुरुवात करावी, अन्यथा कोणत्याही क्षणी नदीत उतरून जलआंदोलन सुरू करू, असा इशारा चिपळूण बचाव समितीने दिला आहे. शासनाकडून तातडीने हालचाली होत नसल्याने चिपळूणवासीयांनी आता उग्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.
जुलै महिन्यात आलेल्या महापुराने संपूर्ण चिपळूण उद्ध्वस्त झाले. भविष्यात चिपळूणला पुरमुक्त करण्यासाठी वाशिष्ठी नदीचा गाळ काढणे, हा त्यावरील मुख्य पर्याय आहे. यासाठी चिपळूण बचाव समितीने विविध मागण्या शासनाकडे केल्या आहेत. यामध्ये वाशिष्ठी व तिच्या उपनद्या उगमस्थानापासून मुखापर्यंत गाळ काढणे करीता आवश्यक अध्यादेश काढून आर्थिक नियोजन करणे, चिपळूण व परिसराला उद्ध्वस्त करणारी लाल आणि निळी रेषा रद्द करा, नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्यक्ष गाळ काढण्यास सुरुवात करा या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. मात्र,
यास आवश्यक त्यावेळी शासन वा प्रशासनाकडून आवश्यक तो प्रतिसाद लाभला नसल्याचे मत आंदोलनकर्तांकडून व्यक्त करण्यात आले असून, याच पार्श्वभूमीवर चिपळूण बचाव समितीने प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोेलनास 20 दिवसाचा कालावधी लोटला असून, दिलेल्या इशार्याप्रमाणे आंदोलनकर्त्यांनी जलआंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
चिपळूणमधील उपोषणादरम्यान राज्य सरकारने दोनवेळा बैठका घेऊन काही प्रमाणात उपाययोजना केल्या. यासाठी शासनाने जलसपंदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली टीम तयार केली आहे. मुख्य अभियंता विजय घोगर यांनी चिपळूण बचाव समितीच्या प्रतिनिधींना निमंत्रित करून या संदर्भातली माहितीही दिली. त्यांच्याकडून सूचनाही मागवल्या आहेत. त्याप्रमाणे समितीच्या सदस्यांनी गाळ काढण्यासाठी यंत्रसामग्री व गाळासंदर्भात काही सूचना केल्या होत्या.
या सूचनांची अंमलबजावणी आपण आठ दिवसांत करू, अशी हमी मुख्य अभियंता यांनी दिली होती. काही प्रमाणात यंत्रसामग्री आली असली तरी एकूण कामाचे स्वरूप व शिल्लक राहिलेला वेळ पाहता हे काम पूर्ण सक्षमतेने यंत्रसामग्री लावूनच होणे अपेक्षित आहे, असे समितीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
शांततेने साखळी उपोषण सुरू ठेवले तरी शासनाकडून त्याची गंभीर दखल घेतली जात नाही. यामुळेच कोणत्याही क्षणी नागरिकांच्या साथीने वाशिष्ठी नदीच्या पाण्यात उतरून आंदोलन करणार आहोत.
अरुण भोजने, चिपळूण बचाव समिती