सुज्ञ नागरिकांना राष्ट्रवादीकडून विनोदाची मेजवानी
। रोहा । प्रतिनिधी ।
ऋतुमानानुसार रायगड जिह्यात निर्माण झालेल्या थंडीमुळे वातावरणाचा पारा खाली गेला असला, तरी रोह्यामध्ये मुळ मुद्द्याला बगल देत कमानीचे राजकारण दिवसागणिक तापत असल्याचे आढळत आहे.
रोहा शहरात नगरपालिकेच्या वतीने विद्यमान सत्ताधार्यांनी अनेक कमानी उभारल्या आहेत. मात्र, रोह्याचे भूषण अशी ओळख असणार्या डॉ.चिंतामणराव देशमुख यांच्या नावाची कमान मात्र दुर्लक्षित आहे. यासंदर्भात दै.कृषीवलच्या माध्यमातून वृत्त प्रसिद्ध करून नगरपालिका सत्ताधार्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
पण पालिकेचे सत्ताधारी नवीन कमानी, नवीन टेंडर आणि अर्थातच नवीन मलिदा या धोरणानुसार काम करत असल्याने, अष्टमी नाक्यावर कमानी उभारून या कमानीला विद्यमान नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांचे वडील कै.शंकर बाबुराव पोटफोडे यांचे नाव देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
यानुसार, या कामाचे पालकमंत्री, खासदार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. कमानीच्या बांधकामासाठी सदर जागेवर असणारी बांधकामे हटविण्यात आली. कामाचे टेंडर तब्बल 37 लाखांचे निघाले. यामुळे रोहा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई यांनी रोह्यातील राम मारुती चौकात नप सत्ताधारी वर्गाला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला असल्याचे सांगणारा एक फलक लिहिला आणि कमानीवरून राजकारण तापले.
अर्थातच यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या फलकावर लिहिण्यात आलेल्या मूळ प्रश्नावर कोणीच बोलत नसल्याचे दिसून येत आहे. या फलकाच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार विजय देसाई यांनी रोहा शहरातील नागरिकांचा आयुर्विमा काढण्याकडे नप सत्ताधारी करत असलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
महाड नगराध्यक्षा स्नेहल माणिक जगताप यांनी नगरपालिकेच्या वतीने महाड शहरातील नागरिकांचा विमा उतरवला आहे. पण रोहा नप सत्ताधारी मात्र केवळ राणा भिमदेवी थाटात घोषणा करतात. पण रोहेकर नागरिकांचा विमा उतरविण्याच्या दृष्टीने कोणतीही तरतूद न करता कमानी उभारून केवळ गल्लाभरू कामे करत आहेत, याकडे लक्ष वेधले आहे.
कोरोना काळात रोहा शहरातील 81 जणांचा मृत्यू झाला.रोह्यातील नागरिकांना मालमत्ता कर, पाणीपट्टी,व्यवसाय कर यामध्ये कोणतीही सवलत देण्यात आली नाही. जनतेकडून कररूपाने जमा झालेला पैसा कमानी सारख्या फुटकळ कामात खर्च करण्यापेक्षा नागरिकांचा विमा उतरविण्याच्या कामात खर्च करावा, असे या फलकाच्या माध्यमातून सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे.
नगराध्यक्षांनी सोशल मीडियावर आपले मत प्रकट करताना खर्च का वाढला, अष्टमीचा इतिहास, लागणारे टॅक्स यावर भाष्य केले. त्यांच्या समर्थकांनी नगराध्यक्ष यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या. तर विरोधकांनी अवास्तव खर्च, कै.पोटफोडे यांचे योगदान काय, यावरून सोशल मीडियावर तारे तोडले.
यामधून एक बाब मात्र अधोरेखित होत आहे, ती म्हणजे सत्ताधारी असो किंवा विरोधक मूळ प्रश्नाला बगल देत, आगामी निवडणुकीच्या तोंडावर राजकारण करण्याचा हेतू मनात ठेवणारे राजकारणी आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात तापमान वाढत असले, तरी सुज्ञ नागरिकांना विनोदाची आयती मेजवानी मिळत आहे.