विहिरीत आढळले दोन मुलींचे मृतदेह

| नाशिक | वृत्तसंस्था |

कळवण तालुक्यात एका विहिरीमध्ये दोन मुलींचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत मुलींपैकी एक अल्पवयीन आहे, तर दुसरी तरूणी 20 वर्षांची असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही घटना सोमवारी (दि.26) रोजी उघडकीस आली होती, या दोन्ही मुली मैत्रिणी होत्या, अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात दोन मुलींचे मृतदेह विहिरीत आढळले. एकाच वेळी दोन मुलींचे मृतदेह आढळून आल्याने कळवणमध्ये मोठी खळबळ उडाली होती. माधुरी मोरे (20)आणि गीतांजली एखंडे (13) अशी दोन मुलींची नावे आहेत. या दोन्ही मुली मैत्रिणी होत्या. त्या रविवारी (दि.25) रोजी सोबतच घराबाहेर पडल्या होत्या. परंतु त्यानंतर त्या घरी परतल्याच नाही, या दोन्ही मुलींच्या घरचे त्यांचा शोध घेत होते. कळवणच्या लिंगामे गावातील गोपीनाथ पालवी यांच्या शेतातील विहिरीमध्ये या दोन्ही मुलींचे मृतदेह सोमवारी (दि.26) ऑगस्ट रोजी आढळले होते. याप्रकरणी भावना पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकाच विहिरीमध्ये दोघींचा मृतदेह आढळून आल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे, मात्र हा घातपात आहे की आत्महत्या याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे, या घटनेबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version