खड्डयांमुळे अपघाताची शक्यता
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या चिरले-दास्तानफाटा धोकादायक बनला आहे. जोरदार पाऊस आणि अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची आणखी दयनीय अवस्था झालेली आहे. रस्त्यावर अक्षरशः मोठे मोठे खड्डे निर्माण झाले असून हा रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे अपघात होण्याची संभावना निर्माण झाली आहे.
जेएनपीटी बंदराच्या अनुषंगाने आयात – निर्यातीसाठी तालुक्यात विविध गावांच्या हद्दीत मोठमोठी अधिकृत अनधिकृत गोदामे, एमटी यार्ड साकारण्यात आले आहेत. मात्र जे रस्ते अवजड वाहतुकीसाठी बनविले नाहीत. त्याच रस्त्यातून मार्ग काढण्यासाठी ट्रेलरची अवजड वाहतून केली जात आहे. या सततच्या अवजड वाहतुकीमुळे येथील रस्ते खड्डेमय झाले असून धोकादायक बनले आहे. तसेच चिरले ते दास्तान या दरम्यान रेल्वेच्या पुलाचे काम सुरू असल्याने आणि अवजड वाहतुकीमुळे या रस्त्यावर चिखलाचा राडा निर्माण झाला आहे.रस्ताच शिल्लक राहिला नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
ज्या ठेकेदारामार्फत रेल्वे उड्डाणपूल बनविला जात आहे त्या ठेकेदारामार्फत ह्या रस्त्याची डागडुजी झाली नसल्याने ह्या मार्गावर खड्डे आणि चिखलाचा राडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून छोट्या वाहनांनी मार्गक्रमण कसे करावे असा असाही प्रश्न वाहन चालकांना पडत आहे.त्यामुळे शासन स्तरावर या मार्गाची दखल घेऊन रस्ता नव्यने बनवून मजबुतीकरण करावे अशी मागणी होत आहे.
या मार्गावर खूप मोठे खड्डे निर्माण झाले आहेत मोटारसायकल चालविणे जिकरीचे झाले आहे. हा मार्ग दुरुस्त झाला नाही तर खड्ड्यातून एखादा अपघात होऊ शकतो.
सनी पाटील, वाहनचालक
ह्या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरवात केली होती. परंतु येथील रहिवाशाच्या घरात पाणी जात असल्याने पाईप टाकून येत्या रविवार पर्यत काम पूर्ण करून घेतले जाईल.
नरेश पवार, सा. बांधकाम उपअभियंता