मोकळ्या भूखंडावर करणार रोपांची लागवड
| पनवेल | वार्ताहर |
औद्योगिक कारखान्यांमधून होणाऱ्या प्रदूषण नियंत्रणासाठी प्रदूषण महामंडळाने कंबर कसली आहे. याच अनुषंगाने रात्रीच्या वेळी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच प्रदूषण करणाऱ्या कंपन्या पाच तास बंद ठेवण्यात येत असून औद्योगिक क्षेत्रात मोकळ्या भूखंडावर हरित पट्टा तयार करण्यात येणार आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्रात रात्री सोडण्यात येणाऱ्या केमिकलमुळे तळोजा, खारघर, रोडपाली, कळंबोली आणि जवळपास असलेल्या गावांना त्रास होत आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या प्रदूषणामुळे लहान मुले, वयोवृद्ध नागरिक, तसेच गरोदर स्त्रियांना उग्र वासाचा त्रास होत आहे. त्यामुळे विविध सामाजिक संस्थांनी प्रदूषणाविरोधात आंदोलन छेडल्याने काही प्रमाणात प्रदूषण कमी होण्याचा दावा केला जात आहे. तसेच तळोजातील आदर्श सामाजिक संस्थेच्यावतीने लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीमुळे प्रदूषण महामंडळाने कंबर कसली आहे. याच अनुषंगाने प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी रात्रीच्या वेळी चार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच प्रदूषण महामंडळाकडून कंपन्यांतील पाण्याचे नमुने तपासणी केली जात आहे. तसेच प्रदूषण करणाऱ्या कंपन्या रात्रीच्या वेळी पाच तास बंद ठेवणे तसेच काही कंपन्यांकडून प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास येताच तात्काळ नोटीस बजावणे, पर्यावरणाविषयी जनजागृतीसाठी कंपनीमध्ये बैठक घेणे, औद्योगिक क्षेत्रातील मोकळ्या भूखंडावर आंबा, फणस, कडुनिंब, चाफा या रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी पथक तैनात करण्यात आले आहे. मोकळ्या भूखंडावर विविध प्रकारची झाडे लावण्यात येत आहेत. प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी कंपनी ओनर्स असोसिएशनसोबत बैठक घेण्यात येणार आहे.
विक्रांत भालेराव, क्षेत्रीय अधिकारी,
प्रदूषण महामंडळ, तळोजा