उड्डाणपुलवरुन जीवघेणा प्रवास सुरु

| पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेल वसाहत आणि पनवेल शहराला जोडण्याऱ्या उड्डाणपुलाची सध्याची अवस्था जिवघेणा पुल अशी झाली आहे. पाहतो, करतो आणि तात्पुरती डागडुजी अशा स्वरुपातील उपाययोजनांमुळे या पुलावरील प्रवास वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. शुक्रवारी या पुलावरील खड़्डे बुजविण्यासाठी लावलेले पेव्हरब्लॉक अक्षरशा निखळून बाहेर पडले. त्या खड्यात साचलेल्या पाण्यातून आणि रुतलेल्या पेव्हरब्लॉकमधून वाहनचालक जिव मुठीत घेऊन प्रवास करत होते.

पनवेल आणि नवीन पनवेल या दोनही वसाहतींना जोडणार्‍या पुलाची निगा ठेवण्याची जबाबदारी अजूनही सिडको महामंडळावरच आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या पुलावरील खड्यांमुळे पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सूरु होती. कोंडी टाळण्यासाठी पनवेल वाहतूक पोलीसांनी याबाबत सिडको मंडळाला पत्र व्यवहार केला आहे. पनवेलमधील जागरुक नागरीक, सामाजिक कार्यकर्ते आणि काही राजकीय पक्षांकडून या पुलावरील खड्डे बुजविण्यासाठी विविध आंदोलने तसेच लेखी पत्र व्यवहार अधिकार्‍यांकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतू निविदा प्रक्रीयेतच ही कामे होणार असल्याने अधिकार्‍यांनी करतो, पाहतो प्रक्रीया सूरु असल्याची अनेकवेळा नागरिकांना सबब दिली.

गुरुवारी रात्रीपासून ते शुक्रवारी दिवसभर कोसळत असलेल्या मुसळधारांमुळे येथील खडडे बुजविण्यासाठी तात्पुरती लावलेली पेव्हरब्लॉक निखळन रस्त्यावर आले होते. साचलेल्या पाण्यात आणि पेव्हरब्लॉकला ठोकर लागून वाहनांची चाके रुतली जात होती. अनेकजण साचलेल्या पाण्यातून वाहन चालविण्याचे दिव्य करत होते. यामध्ये सर्वाधिक कस दुचाकी व तीन आसनी रिक्षाचालकांचा लागत होता.

या जिवघेणा उड्डाणपुलावरुन प्रवास केल्यानंतर वाहनचालक पनवेलच्या गेल्या तीनवेळा आमदार असलेल्या प्रशांत ठाकूर यांच्यावर टीका करत आहेत. आ. ठाकूर यांच्याकडे सिडको मंडळाचे अध्यक्षपद काही काळ होते. त्याकाळात या पुलाचे काँक्रीटीकरण का केले नाही अशीही टीका प्रवाशांकडून होत आहे.

Exit mobile version