। उरण । वार्ताहर ।
शासनाने खोल समुद्रातील पावसाळी मासेमारीबंदीच्या दिलेल्या आदेशानंतर मासेमारी ठप्प झाली आहे. यामुळे उरण परिसरातील सुमारे 750 मच्छिमार नौका विविध बंदरांत नांगर टाकून विसावल्या आहेत. त्यामुळे मासळीची आवक मोठ्या प्रमाणावर घटली असल्याने भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. स्थानिक मच्छिमारांकडून बाजारात विक्रीसाठी येणार्या मांदेली, बोंबील, निवट्या, भिलजी, कोळीम, बळा, खेंगट, खुबे, कालवे, चिंबोरी, मुठे, किळशी, ढोमी, चिवणी, कोळंबी, वाकटी, बांगडे, तळ्यातील गोडी मासळी आणि सुकी मासळी येऊ लागली आहे. या दुय्यम प्रतीची मासळी खरेदीसाठी खवय्यांची गर्दी होऊ लागली आहे.
परराज्यातून येणार्या चांगल्या प्रतीच्या मासळीचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने खवय्यांच्या खिशाला चांगलीच चाट बसत असल्याची माहिती करंजा मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र नाखवा यांनी दिली.
याआधीचे दर आजचे दर
पापलेट 800 ते 900 कि. 1200 ते 1500
सुरमई 600 ते 750 कि. 900 ते 1000
कोळंबी 250 ते 400 कि 750 ते 800
रिबनफिश 150 ते 200 कि 250 ते 300
हलवा 450 कि. 750 ते. 800
माकुळ 70 ते 150 कि. 300 ते 400
रावस 700 ते 800 कि. 900 ते 1000
जिताडा 1000 कि. 1200 कि
बांगडा 250 ते 300 कि. 350 ते 400