भादाणेच्या बच्चेकंपनीने दाखविली जिद्द
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दिवाळीच्या निमित्ताने घरोघरी मातीचे गडकिल्ले बनविले खरे, पण निसर्गाच्या अवकृपेने अवकाळीने या किल्ल्यांना जमीनदोस्त करुन टाकले.पण त्या अस्मानी संकटातही बच्चेकंपनीने हार न मानता पुन्हा नव्या जोमाने मातीचे गड उभा करीत आम्ही हार मानणारे मावळे नाहीत हे भादाणे , ता.अलिबाग येथील बच्चेकंपनीने कृतीने दाखवून दिले. दिवाळी आणि गड.किल्ले बनविणे ही अनेक वर्षांची परंपरा आहे.आजही ग्रामीण भागात ही परंपरा मोठ्या उत्साहात जोपासली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या रायगडात तर किल्ले बनविण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते.
विक्रीसाठी पीओपीचे किल्ले
हल्ली दिवाळीत घरोघरी अंगणात मातीचे किल्ले दिसणे म्हणजे खुपच दुर्मिळ झाले आहे. बहुतेकांच्या दारी दगड, वीटा वापरून त्यांचा एकावरएक थर रचून बनवलेले किल्ले दिसून येतात किंवा बाजारात विकत मिळणार्या प्लॅस्टिक किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या साच्यात बनवलेले किल्ले ठेवलेले दिसतात.यामुळे मुलांना किल्ले बनवणे तर दुर पण किल्ले म्हणजे काय हेच माहिती नाही. त्यामुळे झालय अस की हल्लीच्या मुलांना किल्ला म्हणजे साचात बनवलेले प्लॅस्टर ऑफ पॉरिसचे किल्ले हे एवढच माहित आहे. किल्ल्याचे खरे स्वरुप नक्की कसं असते हेच ठाऊक नसते.
भादाणे या छोट्याशा गावातही दरवर्षी असे किल्ले बनविले जातात. नव्या पिढीला आपल्या परंपरेची माहिती व्हावी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचा आदर वाढावा यासाठी स्पर्धाही घेतली जाते. तशीच स्पर्धा यावर्षीही घेण्यात आली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपक्रमात साकारलेले सगळे किल्ले पुर्णपणे मातीचे बनवले आहेत. कोणत्याही प्रकारचे साचे न वापरता हे किल्ले हाताने बनवले आहेत. जसे शिवरायांचे किल्ले आहेत त्याच स्वरूपात बांधले गेले अहेत. ह्या उपक्रमात अगदी लहान मुलांपासून ते मोठया माणसांन पर्यंत सगळयांचाच सहभाग होता. पाच जणांचा गट तयार करुन पाच किल्ले बनवले गेले. पण अवकाळी आलेल्या पावसाने किल्ले ढासळले व ते पुन्हा निर्माण करायला वेळ गेला म्हणून किल्ले प्रदर्शित करायला थोडासा वेळ लागला. तरीही जिद्द न हरता मुलांनी शिवाजी महाराजांचे पाच किल्ले बनवून आपल्यामधील जिद्द दाखवून दिली. या उपक्रमात जय हनुमान क्रिडा मंडळ भादाणे ह्या सर्व सदस्यांनी मनापासून भरपुर मेहेनत घेतली. उपक्रमात बनवलेल्या किल्यांमध्ये शिवाजी माहाराज्यांच्या काळातील पाच किल्ल्यांचा समावेश आहे ते किल्ले पुढीलप्रमाणे – कुलाबा किल्ला (जलदुर्ग), किल्ले सिंधुदुर्ग (जलदुर्ग), कर्नाळा किल्ला (गिरीदुर्ग), लोहगड (गिरीदुर्ग), सागदगड(गिरीदुर्ग)