। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात उन्हाची तीव्रता यावर्षी तब्बल महिनाभर उशिराने शासनाचा टँकर सुरु झाला आहे. गतवर्षी तालुक्यातील आषाणे गावामध्ये पहिला सरकारी टँकर तेथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सुरु करण्यात आला होता. यावर्षी त्याच आषाणे गावासाठी यावर्षी देखील शासनाचा पहिला टँकर सुरु झाला आहे. दरम्यान यावर्षी अद्याप अन्य कोणत्याही गावाचे तसेच आदिवासी वाडीचे प्रस्ताव टँकर सुरु व्हावेत म्हणून कर्जत तहसील कार्यालय तसेच पंचायत समितीकडे प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे टंचाईग्रस्त 27 गावे आणि 68 वाड्यांमध्ये शासनाचे टँकर सुरु झालेले नाहीत.
कर्जत तालुका आदिवासी तालुका असून दुर्गम भागात वसलेल्या या तालुक्यातील उल्हास नदी वगळता अन्य नद्या या उन्हाळ्यात कोरड्या राहतात. त्यामुळे दरवर्षी मार्च महिना सुरु झाला कि पाणीटंचाई जाणवत असते. त्यामुळे कर्जत तालुक्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाकडून पाणीटंचाई कृती आरखडा तयार करण्यात येतो. त्या कृती आराखड्यानुसार कर्जत तालुक्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी विंधन विहिरी खोदणे, विहिरींची दुरुस्ती करणे आणि ट्रँकरने पाणीपुरवठा करणे आदी कामे केली जातात. यावर्षी कर्जत तालुक्यात 27 गावे आणि 68 आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाई असून, तेथे ट्रँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी तब्बल एक कोटी 74 लाखाची तरतूद करावी असा प्रस्ताव आमदार महेंद्र थोरवे यांच्या सहीने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवण्यात आला होता. त्या आराखड्यानुसार पाणी टंचाई दूर करण्यासाठी गाळ काढण्याचे काम केले जाणार आहे. नवीन विंधन विहिरी खोदणे, विंधन विहिरींचे अधिग्रहण करणे, विंधन विहीर जलभरण करणे, आणि बैलगाडी तसेच टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी आराखडा तयार केला आहे.
2024 मध्ये कर्जत तालुक्यात 12 एप्रिल रोजी पहिला शासकीय टँकर सुरु झाला होता, यावर्षी पहिला शासकीय टँकर 11 मे रोजी सुरु झाला आहे. मागील वर्षी 12 एप्रिल पासून 7जून पर्यंत तब्बल टंचाईग्रस्त असलेल्या 16 गावे आणि 27 आदिवासी वाड्या यांना शासनाचे टँकर चे माध्यमातून पाणी पुरवले जात होते.यावर्षी तालुक्यात आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन तसेच सुधाकर घारे फाउंडेशन कडून पाण्याचे टँकर सुरु आहेत.त्यामुळे शासनाचे टँकर सुरु होण्यास महिनाभर उशीर लागला आहे. मात्र, गतवर्षी ज्या गावात शासनाचा पहिला टँकर तेथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सुरु झाला होता त्याच आषाणे गावात यावर्षी देखील पाण्याचा टँकर शासनाला सुरु करावा लागला आहे.
कर्जत तालुक्यातील टंचाईग्रस्त गावे…
मोग्रज, पिंगळस, धामणी, खानंद, अँभेरपाडा, मोहोपाडा, सुतारपाडा, गरुडपाडा कळंब, किरवली भीमनगर, खांडस, ओलमण, बोंडेशेत, आशाने, चेवणे, ढाक, तुंगी,पेठ, अंथराट वरेडी, अंथरट नीड, आषाने, सुगवे, नालधे, कडाव, आंबिवली, पळसदरी, बोरगाव
पाणी टंचाईग्रस्त आदिवासी वाड्या..
भोपळेवाडी, आनंदवाडी, भक्ताचीवाडी, भल्याचीवाडी, पादिरवाडी, मेचकरवाडी, चौधरवाडी, फणसवाडी, जाधव वाडी जांभूळवाडी मोग्रज, बांगरवाडी,पेटारवाडी, काठेवाडी, चाफेवाडी, तळ्याची वाडी कडाव, वडाचीवाडी, टेपाचीवाडी, मोरेवाडी, ताडवाडी, बनाचीवाडी, बेलाचीवाडी, भागूची वाडी एक आणि दोन, मेंगाळवाडी, चिमटेवाडी, विठ्ठल वाडी, किरवली ठाकूरवाडी, सावरगाव ठाकूरवाडी, धोत्रेवाडी, हिरेवाडी, हर्याचीवाडी,आषाने ठाकूरवाडी, जांभुलवाडी वारे, चिंचवाडी, ठोंबरवाडी, खांडपे माणगाव ठाकूर वाडी, नवसूची वाडी, चाहूचीवाडी, मिरचोलवाडी, भोमलवाडी, नांदगाव विठ्ठलवाडी, नारळवाडी, दामत कातकरीवाडी, पाच खडकवाडी, ठोंबरवाडी, रजपे कातकरीवाडी