भारतीय संघाची उपांत्य फेरीत धडक

|जॉर्जटाउन | वृत्तसंस्था |

यंदाच्या टी-20 विश्वचषकात सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव केला आहे. या विजयाने भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये धडक मारली. आता भारताचा दुसऱ्या सेमीफायनलमध्ये 27 जून रोजी इंग्लंड विरुद्ध सामना होईल.

तत्पूर्वी सामन्यात मिचेल मार्शने नाणे फेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने रोहित शर्माच्या 41 चेंडूत 92 धावांची झंझावाती खेळी आणि हार्दिक पांड्या शिवम दुबे यांच्या मोलाच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने 206 धावांचा विशाल लक्ष्य कांगारुसमोर ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत मिचेल स्ट्रार्क आणि मार्कस स्टॉइनिस यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले.

भारताने दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड याने एकाकी झुंज दिली. त्याने 43 चेंडूमध्ये 76 धावांची वादळी फलंदाजी केली. हेड याने चार षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 76 धावांचा पाऊस पाडला. हेड याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार मिचेल मार्श याने 37 धावांचे योगदान दिले, त्याने 28 चेंडूमध्ये दोन षटकार आणि तीन चौकार ठोकले. ग्लेन मॅक्सवेल यानं 12 चेंडूत 20 धावांची खेळी केली. हेड आणि मार्श यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. डेविड वॉर्नर, मार्कस स्टॉयनिस, टीम डेविड, मॅथ्यू वेड यांना मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक तीन बळी घेतले. कुलदीप यादव याने 4 षटकात 24 धावांच्या मोबदल्यात दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक एक बळी घेतला. 

भारताने बदला घेतला 
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला. 2023 वनडे वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. त्याची खंत भारतीयांच्या मनात होतीच. त्याचा बदला आज रोहित शर्मा आणि कंपनीने घेतला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. भारताविरोधात झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियावर स्पर्धेबाहेर जाण्याचं संकट ओढावले आहे. अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव केला, तर ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात येईल. 
रोहित शर्माची वादळी फलंदाजी 
त्याआधी प्रथम फलंदाजी करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या आतषबाजीनं सेंट ल्युशियाचं डॅरेन सॅमी स्टेडियम निनादून गेलं. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या सुपर एट साखळीत भारतीय कर्णधारानं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना अक्षरश: फोडून काढलं. पण या सामन्यात रोहित शर्माचं शतक अवघ्या आठ धावांनी हुकलं. त्यानं 41 चेंडूंत सात चौकार आणि आठ षटकारांसह 92 धावांची खेळी उभारली. विराट कोहलीचा अपवाद वगळता भारताच्या इतर फलंदाजांनीही धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. त्यामुळंच भारताला वीस षटकांत पाच बाद 205 धावांची मजल मारता आली.  
उपांत्य फेरीत इंग्लंडशी लढत 
भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा सामना 27 जून रोजी इंग्लंडविरोधात होणार आहे.  गुरुवारी संध्याकाळी भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना होणार आहे.  अ संघामध्ये भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे, टीम इंडिया विश्वचषकात अद्याप अजेय आहे. 27 तारखेला पावसाने खोडा घातला तर भारतीय संघ थेट फायनलमध्ये दाखल होईल.
Exit mobile version