बोर्लीपंचतन बसस्थानकाचा तिढा कायम

तीन वर्ष उलटूनही मागणीकडे दुर्लक्ष

| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील एसटी निवारा शेडच्या मागणीला तीन वर्ष उलटली आहेत. मात्र, धनदांडग्यांच्या विरोधापुढे स्थानिक प्रशासन देखील हतबल झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांना बसस्थानक मिळू शकले नाही. त्यामुळे अजून किती वर्ष उन्हाळे पावसाळे झेलत प्रवाशांनी रस्त्यावर ताटकळत उभे राहायचे असा संतप्त सवाल पंचक्रोशीतील जनमानसातून केलं जातं आहे.

बोर्लीपंचतन शहरात 2021 मध्ये अतिक्रमनावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे जुन्या बसस्थानक ठिकाणी मोकळ्या भूखंडावर नव्याने बसस्थानक बांधण्यात यावे. अशी मागणी जनमानसातून करण्यात आली. मात्र, एसटी स्थानकाचा अडथळा होऊ नये, यासाठी चार-चौघांकडून सातत्याने विरोध केला जात आहे. त्यामुळे बसस्थानकाचा तिढा आजपर्यंत सुटलाच नाही. यासाठी ग्रामस्थांनी देखील पुढाकार घेऊन, कित्येक ग्रामसभेला ठराव मंजूर करून घेतला. मात्र, प्रशासनाने कागदी घोडे नाचवण्यातच वेळ घालवल्याने बसस्थानकाचे स्वप्न अपूर्णच राहिले. परिणामी प्रवाशांना एसटी ची वाट पाहताना या रखरखत्या उन्हात चटके सोसावे लागत आहेत.

तालुक्यातील बोर्ली हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने 42 गाव खेड्यांचा तसेच दिवेआगर, हरिहरेश्वर, दिघी-जंजिरा अशी पर्यटन स्थळे एसटी वाहतुकीने जोडली गेली आहेत. येथे दिवसातून येणाऱ्या-जाणाऱ्या 78 गाड्यांची नोंद होत असून मुंबई, पुणे शहारांकडे नेहमीच नागरिक प्रवास करत आहेत. सद्या ऑक्टोंबर मधील उन्हाची झळ वाढत आहे. अशातच शेकडो विद्यार्थ्यांसह अबाल वृद्ध प्रवासी भर उन्हात बसची वाट बघत रस्त्यावर ताटकळत उभे राहत असतात. कारण प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे अद्याप महामंडळाचा सर्व कारभार वाऱ्यावर आहे. बसस्थानकाची मागणी अजूनपर्यंत पूर्ण झाली नसल्याने येथील नागरिक तथा प्रवाशी संताप व्यक्त करीत आहे.

Exit mobile version