कृषीवलच्या वृत्ताने प्रशासनाला जाग; जिल्हा प्रशासनाकडून रस्त्याचे मोजमाप सुरू
। चिरनेर । वार्ताहर ।
चिरनेर येथील केळाचा माळ आदिवासी वाडीवरील ‘विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची बिकट वाट’ या मथळ्याखाली कृषीवलने बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली असून, याठिकाणी पक्का रस्ता करण्यात येणार आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बातमीची गंभीर दखल घेतली असून, रस्त्याचा प्रश्न लवकर निकाली काढण्यात येणार आहे. त्यासाठी दोन अभियंत्यांनी रस्त्याची पाहणी करुन प्रत्यक्ष रस्त्याचे मोजमाप घेतले आहे. त्यामुळे आदिवासींच्या खडतर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा दिसू लागली आहे.
चिरनेर ग्रामपंचायत हद्दीमध्ये केळाचा माळ ही सुमारे 250 वस्ती असलेली आदिवासी वाडी आहे. आदिवासी कातकरी समाजाची वस्ती असणार्या या वाडीवरील जनतेला चिरनेर गावात जाण्यासाठी डोंगराच्या चिखल मातीच्या वाटेतून दोन किलोमीटरची पायपीट करावी लागते. या वाडीवरील चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी पहाटे लवकर उठून चिरनेर येथील माध्यमिक शाळेत जाण्यासाठी हाच चिखल मातीचा रस्ता तुडवीत रोज जावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप बिकट प्रसंगातून प्रवास करावा लागत असल्याने आदिवासी बांधवांनी वेळोवेळी पक्का रस्ता करण्याची मागणी करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत होते. याबाबतचे वृत्त ‘कृषीवल’ने प्रकाशित करून आदिवासींच्या रस्त्याची सत्यता मांडली होती. आदिवासी समाजाची ही समस्या डॉ. किरण पाटील यांना समजल्यावर या रस्त्याचा प्रश्न असणार्या अडचणी समजून घेण्यासाठी जिल्हा परिषदचे उपअभियंता आर.एस देवांग व शाखा अभियंता अनिल जाधव यांना चिरनेर येथे पाठविले. त्यांनी त्यांनी संबंधित रस्त्याचे आदिवासी वाडीपर्यंत जाऊन पाहणी करून रस्त्याचा आराखडा बनवण्यासाठी रस्त्याचे मोजमाप घेतले.
या रस्त्यातील एक किलोमीटर अंतरासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक असल्याचे उपअभियंता आर एस देवांग यांनी नमूद केले. यावेळी शासकीय अधिकार्यांसह जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, सरपंच संतोष चिरलेकर, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल नारंगीकर, ग्रामविकास अधिकारी महेश पवार, प्रफुल्ल खारपाटील, सचिन घबाडी, अविनाश पाटील उपस्थित होते.