मुंबई लोकसभा निवडणूकीसाठी ‘या’ अभिनेत्रीचं नाव चर्चेत

| मुंबई | प्रतिनिधी |
हेमा मालिनी, राज बब्बर, जया बच्चन, धर्मेंद्र, सनी देओल, उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर आता बॉलिवूडमधील अजून एक नाव राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा सुरु आहे. आता मुंबईतून एक प्रसिद्ध अभिनेत्री निवडणूक लढवू शकते. बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने राजकारणात सक्रीय होणार असल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून माधुरीला तिकीट दिले जाणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबई भाजपकडून मात्र या चर्चेला दुजोरा दिला गेलेला नाही.

लोकप्रियतेमुळे अनेकदा कलाकार निवडणूक जिंकून संसदेतही पोहोचतात. काही कालाकार जनतेने दिलेल्या संधीचा योग्य फायदा करुन घेतात. बॉलिवूडनंतर आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये राजकारणात जम बसवतात. आपल्यासमोर दिवंगत अभिनेते सुनील दत्त आणि गोविंद ही दोन उदहारण आहेत. सुनील दत्त अखेरपर्यंत राजकारणात टिकून राहिले. त्यांनी त्यांच एक वेगळ वलय निर्माण केलं. तेच दुसऱ्याबाजूला गोविंदाच उदहारण आहे. लोकप्रियतेच्या लाटेवर उत्तर मुंबईतून निवडणूक जिंकून लोकसभेत पोहोचला. पण त्यानंतर तो जनतेमध्ये फार दिसला नाही. परिणामी दुसऱ्यांदा त्याला तिकीट मिळालं नाही.

अनेकदा एखाद्या मतदारसंघात राजकीय पक्षाची तितकी ताकद नसते. त्यावेळी कलाकाराची प्रतिमा, त्याच्या वलयाचा वापर करुन घेण्याचा राजकीय पक्षाचा प्रयत्न असतो. पश्चिम बंगालमध्ये बहुतांश कलाकार आता राजकारणात सक्रीय झाले आहेत. त्यांनी तिथे स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली आहे. दक्षिणेत काही कलाकारांना राजकारणात जम बसवण्यासाठी त्याच्या चित्रपटातील इमेजचा भरपूर फायदा झाला.

Exit mobile version