कालवली पाटीलवाडीत दोन दिवस वीज गायब
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
तालुक्यातील महावितरणचे खुमासदार किस्से दररोज ठिकठिकाणाहून ऐकण्यास येत असून रविवारी पहाटे शिंपडलेल्या अवकाळी पावसामुळे चक्क विद्युतवाहक तारा असलेला एक खांब धाराशायी झाला. या घटनेकडे पोलादपूर तालुक्यातील महावितरणच्या अभियंत्यांकडून दोन दिवस सपशेल दूर्लक्ष करण्यात आल्याने कालवली पाटीलवाडीतील ग्रामस्थांना दोन दिवस वीज पुरवठ्याविनाच काढावे लागल्याचा त्रास नाहक सोसावा लागला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास याच परिसरात अवकाळी पावसाचे आगमन होऊन शिंपडल्यासारखा पाऊस पडल्यानंतर कालवली स्टॉपच्या मागील बाजूच्या डीपीजवळील एक विजेचा खांब जमिनीवर कोसळला. यामुळे खांबावरील विद्युतवाहक तारांमुळे आजूबाजूचे खांबदेखील तिरके झाले. कालवली पाटीलवाडी ग्रामस्थांनी या घटनेची माहिती स्थानिक जनमित्र तसेच अभियंता यांना सांगितली. मात्र, रविवारी दिवसा तसेच सोमवारीदेखील याप्रश्नी महावितरणच्या अभियंत्यांनी घटनेची दखल न घेतल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. या सर्व प्रकाराने मेटाकुटीस आलेल्या ग्रामस्थांना अभियंता सुद यांच्याकडून तातडीने कार्यवाही होईल, अशी अपेक्षा असताना ठेकेदारांची बिले रखडली असल्याने ठेकेदार काम करीत नसल्याचे सांगून या घटनेकडे कानाडोळा केला गेला. यामुळे काही ग्रामस्थांनी मध्यस्थांमार्फत कार्यकारी अभियंता पाचपोहे यांच्याकडे ही समस्या मांडून तातडीने कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली असता त्यांनी तातडीने विद्युतपुरवठा सुरू होण्यासाठी खांब बदलण्याची ग्वाही दिली.