मुंबई | प्रतिनिधी |
उदगीर,जि.लातूर येथे मार्च 2022 मध्ये होणार्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड करण्यात आली. करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात राहिला, तर संमेलन आयोजित करण्याच्या दृष्टीनं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक रविवारी उदगीर इथं पार पडली.
अध्यक्षपदासाठी भारत सासणे यांचे नाव बरीच वर्षे चर्चेत होतं.निवडणूक प्रक्रिया असताना त्यांनी निवडणूकही लढवली होती. फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावामुळं सासणे यांचं नाव दोन वर्षे पिछाडीवर पडलं होतं. उस्मानाबाद इथं झालेल्या संमेलनात दिब्रिटो; तसेच नाशिक इथं नुकत्याच झालेल्या संमेलनात नारळीकर सक्रिय न राहिल्यानं यापुढं चालता-बोलता अध्यक्ष नेमण्याचं महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी ठणकावलं होतं. त्यानुसार सासणे यांच्या नावावर सहमती झाली.मराठवाडा साहित्य परिषद आणि उदयगिरी महाविद्यालय या संमेलनाच्या आयोजक संस्था सासणेंसाठी आग्रही होते. याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ; तसंच संलग्न आणि समाविष्ट संस्थांनी सासणे यांच्या नावाला पसंती दिली आहे. लेखक भास्कर चंदनशिव, बाबा भांड, अच्युत गोडबोले आणि डॉ. रामचंद्र देखणे यांचीही नावे चर्चेत होती.
95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने मनस्वी आनंद झाला आहे. घुमान येथे 2015 मध्ये झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती. आता सन्मानाने निवड झाल्याबद्दल आनंदी आहे.
भारत ससाणे,नियोजित अध्यक्ष