ओला काजूगर खातोय भाव; किंमत शेकडा तब्बल 350 रुपये

खवय्यांची खरेदीसाठी लगबग

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

बदलत्या हवामानामुळे यावर्षी आंबा आणि काजूचा मोसम लांबला असून, डिसेंबरमध्ये मिळणारे काजू फेब्रुवारीत दाखल झाले आहेत. हे काजूगर उशिरा दाखल झाले असले तरी त्यांना भाव आहे. 300 ते 350 रुपये शेकडा असा दर असतानाही या काजूगराला मागणी असून, खरेदीसाठी खवय्ये गर्दी करीत आहेत.


ओला काजूगर म्हटले की सगळ्यांच्याच जिभेला पाणी सुटते. सध्या सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा व माणगाव येथे बाजारात काही प्रमाणात ओले काजूगर अल्प प्रमाणात विक्रीसाठी येत आहेत. यंदा काजू व आंबा पीक आहे. उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी काजूच्या झाडांना मोहर व छोट्या बिया आल्या आहेत. तर तुरळक झाडांच्या बिया मोठ्या झाल्या आहेत. आणि यातील काजूगर विक्रीसाठी येत आहेत. अजून ओल्या काजुगराचा हंगाम सुरू होण्यास अवकाश आहे. आदिवासी महिला हा रानमेवा विकायला घेऊन येत आहेत.


सध्या भाव चांगला मिळत त्याही आनंदी आहेत. माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा आदी ठिकाणी काजूगर शेकड्याने मिळतात. तर पाली, रोहा, पेण आदी ठिकाणी वाट्यावर मिळतात. भाव जास्त असला तरी खवय्ये मात्र चढ्या भावानेदेखील काजूगर खरेदी करीत आहेत. साधारण महिन्याभरानंतर उत्पादन वाढल्यावर काजूगर मुबलक उपलब्ध होतील. त्यामुळे त्यांचा भावदेखील हळूहळू उतरेल, असे श्रीवर्धन येथील काजूगर विक्रेती सुरेखा हिलम यांनी सांगितले. मे महिन्यापर्यंत ओल्या काजूगराचा हंगाम सुरु असतो. काजूगर विकून आदिवासींच्या हाती चांगले पैसेदेखील मिळतात.

घरातील सर्वांनाच ओले काजूगर खूप आवडतात. त्यामुळे श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा या ठिकाणी आलो की आवर्जून ओले काजूगर खरेदी करतो. किंवा तेथील मित्रमंडळींना सांगून मागवून घेतो. सध्या हंगाम नुकताच सुरू झाल्याने किमती जास्त आहेत, मात्र तरीही खरेदी करतो.

योगेश शिंदे, खवय्ये व इंजिनिअर, पळस्पे


असे बनवतात काजूगराचे चविष्ट पदार्थ
चविष्ट ओले काजूगर वेगवेगळ्या प्रकारे खाल्ले जातात. काजूगराचा रस्सा किंवा सुकी भाजी करुन खाल्ली जाते. पुलाव व बिर्याणीदेखील केली जाते. तसेच मटण, मच्छी, व सुक्या मासळीमध्ये टाकूनसुद्धा काजूगर खाल्ले जातात. असे हे काजूगर जेवणाची लज्जत वाढवितात.

काढण्यासाठी मेहनत व हातांची हालत
दुर्गम, डोंगराळ भागात आणि जंगलात काजूच्या बिया काढण्यासाठी जावे लागते. आदिवासी बांधव अनवाणी उन्हातान्हात बिया काढण्यासाठी जातात. या बियांना मोठ्या प्रमाणात चिक असतो. आदिवासी महिला व बांधव या बियांमधून काजूगर काढतांना हातात मोजे घालत नाही किंवा सुरक्षितता घेत नाही. त्यामुळे त्यांचे हात व बोटे चिकामुळे पूर्णपणे खराब होतात. काही जण राख लावतात, पण त्याने काही फरक पडत नाही. शासनाकडून त्यांना हातमोजे देणे तसेच सहाय्य करणे गरजेचे आहे, असे सुधागड तालुक्यातील आदिवासी नेते रमेश पवार यांनी सांगितले.

Exit mobile version