| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पाली नगरपंचायतीत जनतेने शेकाप राष्ट्रवादी आघाडीवर विश्वास ठेवून सत्तेत संधी दिली. जनतेचा विश्वास सार्थकी ठरविण्यासाठी पाली नगरसेवकांनी विकासकामांचा आराखडा काढून विकासकामांना सुरुवात करावी, पालीकर जनतेला अपेक्षित विकास शेकाप राष्ट्रवादी आघाडी करून दाखवेल, असा विश्वास खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
सुधागड तालुक्यातील प्रतिष्ठेच्या पाली नगरपंचायतीवर राष्ट्रवादी व शेकाप व आघाडीचा झेंडा फडकल्यानंतर खा. सुनील तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पाली येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पहिली विशेष बैठक संपन्न झाली. यावेळी खा.तटकरे यांनी नवनिर्वाचित पाली नगरपंचायतीच्या राष्ट्रवादीच्या पहिल्या नगराध्यक्षा गीता पालरेचा, शेकापचे उपनगराध्यक्ष आरिफ मनियार, तसेच राष्ट्रवादी व शेकाप आघाडीचे नगरसेवक व नगरसेविका यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व सर्व पालीकरांचे तटकरे यांनी मनापासून आभार मानले.
यावेळी खासदार सुनील तटकरे, अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, शेकापचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, राष्ट्रवादी रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंखे, ग.रा म्हात्रे, अभिजीत चांदोरकर, साक्षी दिघे, हर्षा चांदोरकर, ललित ठोंबरे, सुनील राऊत, किरण खंडागळे, प्रकाश पालरेचा, परेश वडके,परेश घरत आदींसह राष्ट्रवादी व शेकाप आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की, पाली नगरपंचायतीचे सूत्रे आघाडीच्या हातात देऊन योग्य परीने निवड केली असल्यामुळे आता अपेक्षापूर्तीची जबाबदारी आपल्या सर्वांवर आली असून, दीर्घकाळ रखडलेली पाली शहरातील विकास कामांना वेग देऊन पालीकरांनी आघाडीवर दाखवलेला एक दृढ विश्वास व पालीकरांनी सेवा करण्याची दिलेल्या संधीचे मनापासून आभार मानून त्यांनी दाखवलेला विश्वास अधिक दृढ करण्याचे काम, कदापि तडा जाणार नाही या पद्धतीचे काम आम्ही सर्वजण समुदाहिक रित्या करू. जाहीरनाम्यात दिलेला प्रत्येक शब्द कृतीत उतरवू, जास्तीत जास्त विकासकामे करण्याचे आश्वासन यावेळी खासदार तटकरे यांनी दिले.