सिंहस्तंभ वाचविण्याचा नावाखाली कोणाच्या बांधकामाला संरक्षण?
| महाड | उदय सावंत |
किल्ले रायगड एन एच 166 एफ महामार्गाचे काम गेली पाच वर्ष सुरू असून, मुंबई- गोवा महामार्गालगत करंजखोल गावाच्या हद्दीत नातेखिंडे या ठिकाणी या महामार्गाचे काम रखडले असून, नातेखिंडीत एका देवीचे मंदिर व महाड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा पाईपलाईन यामुळे या कामाला विलंब होत आहे. या ठिकाणी होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी गटार संरक्षण असणे गरजेचे असताना, तसेच या ठिकाणी सिंहस्तंभ हटवणे गरजेचे असताना या दोन्ही गोष्टी न करता कोणाच्या बांधकामाला संरक्षण दिले जात आहे, असा प्रश्न नागरिक व प्रवाशांना पडला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगडकडे महाडकडून जाणाऱ्या राज्य मार्गाला काही वर्षांपूर्वी महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला. त्याच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. मात्र, हे काम गेली पाच वर्षापासून पूर्ण झालेले नाही. वाळसूर येथील पूल, लाडवली पूल आजही अपूर्ण अवस्थेत आहेत. तर या महामार्गावर अनेक ठिकाणी संरक्षण कठड्यांची कामेदेखील बाकी आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर ज्या ठिकाणी हा महामार्ग जोडला जातो. त्या करंजखोल गावात नातेखिंड या ठिकाणी या मार्गाचे काम गेले कित्येक वर्षे रखडले आहे. या ठिकाणी असलेली संकुचित खिंड फोडून रुंदीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, येथे असलेले एक छोटेसे मंदिर व महाड नगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी असल्याकारणाने डोंगर फोडण्याचे कामदेखील थांबविण्यात आले आहे.
महामार्गावरून रायगडकडे जाताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दुकाने, हॉटेल यांची संख्या वाढली असून, अतिक्रमणदेखील वाढले आहे. महामार्गाच्या रुंदीकरणासाठी हे अतिक्रमण हटवणे अत्यंत गरजेचे आहे. या ठिकाणी असणारे महामार्गाची रचना दुतर्फा गटार व मधला 12 मिटर रुंदीचा काँक्रीट रस्ता असा आराखडा असताना या परिपूर्ण आराखड्यानुसार जर या ठिकाणी महामार्ग बांधायचा असेल तर या ठिकाणी असणाऱ्या काही दुकानदार, हॉटेल व्यवसायिकांचे अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे. तसेच दोन दशकांपूर्वी या ठिकाणी दोन सिंहस्तंभ उभारण्यात आले होते. हे सिंहस्तंभ कोणतेच ऐतिहासिक प्रतीक नसून त्याला कोणताही ऐतिहासिक किंवा आधुनिक असा संदर्भ नाही. तसेच या स्तंभाची मोठ्या प्रमाणावरती पडझड झाली आहे. अशावेळी रुंदी करण्याच्या आड येणारे हे दोन्ही स्तंभ या ठिकाणावरून हटवणे गरजेचे आहे. तशी मागणी महाड पत्रकार संघाचे वतीनेदेखील करण्यात आलेली आहे. मात्र, हे दोन स्तंभ न हटवता या ठिकाणच्या महामार्गाच्या काँक्रीटीकरण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अशावेळी हे स्तंभ न हटवण्यामागचे कारण आजही गुलदस्तात आहे. या मागे कोणाच्या बांधकामाला अभय दिले जात आहे? असा प्रश्न आता प्रवासी व नागरिक वर्गाला पडला आहे.
करंजखोल गावातील डोंगर परिसरातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावरती पाणी या रायगड महामार्गावरती येते व नदीच्या स्वरूपात हे पाणी महामार्गावरून वाहून जाते. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीला मोठा अडसर निर्माण होतो. हे पावसाचे पाणी दुतर्फा होणाऱ्या गटारामधून वाहून गेल्यास याचा वाहतुकीला त्रास होणार नाही. मात्र, या ठिकाणचे गटार बांधले गेले नाहीत तर मात्र, हा प्रश्न गंभीर होऊ शकतो व भविष्यात अतिक्रमण रस्त्यावरती येऊ शकते व वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील गंभीर होऊ शकतो.
अशीच काही व्यथा या मार्गावरील असंख्य वृक्षांची आहे. जुना महाड- रायगड मार्ग हा दुतर्फा वृक्षांनी भरलेला होता. मोठमोठे डवलदार वृक्ष सावली देत होती. यामध्ये आंबा, चिंच, वड, पिंपळ यासारखे देखील वृक्ष होते. मात्र, महामार्गाच्या रुंदीकरणावेळी हे सर्व वृक्ष तोडण्यात आले. या वृक्षांच्या बदल्यात या ठिकाणी काही रोपटी लावण्यात आली. मात्र, जोपासना होत नसल्याने व वेळेवरती पाणी मिळत नसल्याने तसेच वनव्यांमुळे ही रोपटी मरून गेलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा ते बहारदार वृक्ष होणे अवघड आहे. अशा या ऐतिहासिक मार्गाचे हरित सौंदर्य पूर्णपणे नष्ट झालेला आहे आणि आणि ते पुन्हा बहरने आता शक्य वाटत नाही. याला केवळ ठेकेदार आणि या महामार्ग विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत.







