रेल्वे स्थानकाला समस्यांचा विळखा

। रसायनी । वार्ताहर ।

रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला परिसर असून येथे विविध उद्योगधंदे आहेत. परिसरात शासकीय कार्यालय, सुख सोयीयुक्त पिल्लई इंटरनॅशनल महाविद्यालय, आर्थव्यवस्थेचे प्रशिक्षण देणारा सेबी प्रकल्प तसेच जवळूनच गेलेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आदिंमुळे रसायनी व परिसराचा नावलौकिक आहे. परंतू, येथील रसायनी रेल्वे स्थानक विविध समस्यांच्या गर्तेत असून स्थानकात योग्य सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या स्थानकावर दिवा-मुंबई, रत्नागिरी, गोव्याच्या दिशेने येणार्‍या रेल्वे गाड्या थांबा घेतात. या स्थानकावर निवारा शेड नसल्याने प्रवाशांना भर उन्हात तर, पावसाळयात भिजत गाडीची वाट पहावी लागते. शिवाय प्रवाशांना बसण्यासाठी स्थानकावर बाकड्यांचीहि व्यवस्था नसल्याने ताटकळत उभे राहावे लागते. तसेच, पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था स्थानकात नसल्याने काही अंतरावर पायपीट करत जावे लागते. रेल्वे तिकीट घरही स्थानकापासून काही अंतरावर असून प्रवासी तिकीट घेऊन येईपर्यंत रेल्वे गाडी जाण्याची वेळ येते, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. तसेच, ध्वनीक्षेपक आणि माहिती यांचा मागमूस या स्थानकातून प्रवाशांना कधीच ऐकायला मिळाला नाही, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान, रसायनी रेल्वे स्थानकावर सोयी-सुविधांचा बोजवारा उडाला असताना, विविध समस्यांनी ग्रासलेल्या या रेल्वे स्थानकाकडे रेल्वे प्रशासनाचे कायमच दुर्लक्ष रहाणार का? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून होत आहे. या स्थानकावरील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.

Exit mobile version