रसायनी रेल्वे स्थानकात सुविधांचा अभाव
| रसायनी | वार्ताहर |
पाताळगंगा रसायनी हे औद्योगिक क्षेत्र असून, याठिकाणी असणारे रसायनी हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून येथील तिकीट घर गायब झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
रसायनी परिसर हा औद्योगिक क्षेत्राने नटलेला असून या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्रीज, सिप्ला, बॉम्बे डाईंग, अल्कली याशिवाय अतिरिक्त एमआयडीसी झोनमध्ये छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. तसेच बीपीसीएल, इस्त्रो यासारख्या सरकारी प्रोजेक्ट येथे कार्यरत आहेत. एज्युकेशन सोसायटीचे पिल्लईसारखे शैक्षणिक संस्था, केंद्र सरकारचे एनआयएसएम सेबी केंद्र याठिकाणी असून, मुख्य रेल्वे स्टेशन असणारे रसायनी रेल्वे स्टेशनमध्ये विविध कमतरता जाणवताना दिसत आहेत. शिवाय, येथील तिकीट घर कोरोनानंतर जे बंद करण्यात आले, ते अद्याप बंदच आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास करणार्या नागरिकांची व विद्यार्थ्यांची त्रेधा उडत असून, त्यांना तिकीट तीन कि.मी.पर्यंत रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वेळ व अतिरिक्त भारही सोसावा लागत आहे. रसायनी रेल्वे स्टेशनला गेले कित्येक वर्षांपासून कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. या ठिकाणी कोकणात जाणार्या गाड्यांची रेलचेल चालू असते. रेल्वे प्रवाशांना निवारा शेड तसेच बसण्यासाठी बाकडे नाहीत, पिण्याच्या पाणीची सुविधा नाही. तसेच महिला वर्गासाठी प्रसाधनगृहसुद्धा नाही. स्थानकाच्या आसपासच्या परिसरात गवत वाढलेले असते. प्रवाशांना पावसात तर उन्हाळ्यात भरउन्हात स्थानकावर रेल्वेची वाट पाहात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांतून खंत व्यक्त केली जात आहे.
रेल्वे स्थानकाच्या बाजूला कष्टकरीनगर, ठाकूरवाडी, जुनी पोसरी अशी गावे आहेत. या गावाला रेल्वे ट्रॅक ओलांडून जावे लागत आहे. या ठिकाणी रेल्वे ट्रॅक ओलांडताना प्रमाणात अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी रेल्वेने याठिकाणी वाहनांसाठी ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग बांधला होता; परंतु या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे तोही सध्या बंद स्थितीत आहे. एकंदरीत, रसायनी रेल्वे स्थानकाला कोणतीही सुविधा नसल्याने नागरिक व प्रवासी वर्गाकडून नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने पूर्णपणे केल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत ग्रामपंचायत तुराडे यांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही परिस्थिती जैसे थे आहे.