स्थानिकांची गैरसोय
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत मधील मोहाचीवाडी येथील रस्त्याचे काम भूमिपूजन झाल्यांनतर आठ महिन्यांनी सुरु झालेले नाही. ऑक्टोबर 2021 मध्ये मोहाचीवाडी रस्त्याचे भूमिपूजन झाले, परंतु आजतागात रस्त्याचे कामाचे सुरु झाले नसल्याने रस्त्याच्या अपूर्ण कामाबद्दल स्थानिकांना गैरसोय होत आहे. रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडले असल्याने स्थानिकांनी रस्त्याचे काम कधी होणार? असा प्रश्न स्थानिक विचारत आहे. दरम्यान, रस्त्याचे काम न केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील मोहाचीवाडी भागात जाणारा रस्ता गेल्या काही वर्षात हा रस्ता खड्ड्यात हरवला आहे. या रस्त्याचे नव्याने बांधकाम करावे अशी स्थानिक शिवसैनिक यांची मागणी होती. त्यानुसार रस्त्याचे काम करण्यासाठी स्थानिक आ.महेंद्र थोरवे यांनी त्या कामासाठी साडे सात लाखाचा निधी मंजूर केला. ग्रामविकास विभागाच्या 25/15 या हेड खाली कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्ता ते मोहाचीवाडी असा रस्ता त्या निधीमधून करण्यात आला. मुख्य रस्त्यापासून 130 मीटर लांबीचा रस्ता बनविण्यासाठी संबंधित कामाचे भूमिपूजन आ.महेंद्र थोरवे यांचे हस्ते 29 ऑक्टोबर रोजी करण्यात आले, त्यावेळी नेरळ ग्रामपंचायत मधील सर्व पदाधिकारी-सदस्य यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मात्र रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर आता सात महिने उलटले आहेत, परंतु आजही रस्त्याचे काम सुरु झालेले नाही. त्यात आता पावसाळा जवळ आला असून खड्ड्यात हरवलेला रस्ता भूमिपूजन झाल्यानंतर सात महिन्यानंतर देखील पूर्वी होता तसाच आहे. रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरूच झाले नसल्याने स्थानिक नाराज आहेत. गेली अनेक दिवस रस्त्याचे काम सुरु होईल अशी अपेक्षा स्थानिकांना होती. परंतु सात महिन्यानंतर देखील रस्त्याचे काम सुरु झाले नसल्याने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे.