| अलिबाग | प्रमोद जाधव |
नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यूकांडाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा कशी आजारी आहे, याची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची तब्बल 630 पदे रिक्त आहेत. त्यात आरोग्य सेवेकांसह दायांची 567 पदे भरण्याबाबत सरकारने हालचाल केलेली नाही. यामुळे अनेक ठिकाणी आरोग्य सेवा कोलमडून गेली आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. मनीषा विखे पाटील यांच्याशी संपर्क सधला असता होऊ शकला नाही.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजार असून दोन हजार पेक्षा अधिक गावे आहेत. जिल्ह्यात 54 प्राथमिक आरोग्य केंद्र असून 188 उपक्रेंद्र व सात जिल्हा परिषद दवाखाने आहेत. यांच्यामार्फत गावे,वाड्यांमधील नागरिकांना उपचार दिले जातात. तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर गावातल्या गावातच उपचार व्हावे यासाठी उपकेंद्रामध्ये सामुदायिक वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. परंतु ग्रामीण भागातील रुग्णालयात 630 पदे रिक्त असल्याचे आकडेवारीनुसार समोर आले आहे. भरलेली 452 पदे कार्यरत आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे.
ग्रामीण भागात आरोग्य सेवक, सहाय्यक पुरुष यांची 194 पदे व आरोग्य सेवक, सहाय्यक महिला यांची 373 पदे रिक्त आहेत. वैद्यकीय सेवा देताना त्यांची भूमिका महत्वाची आहे. मात्र आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक पुरेसे उपलब्ध नसल्याने स्वच्छता व इतर व्यवस्था करणे कठीण जात आहे. ग्रामीण रुग्णालयातच प्रसूती व्हावी यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु दोन दायांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक वेळा तालुक्याच्या ठिकाणी महिलांना प्रसूतीसाठी जावे लागत आहे.
जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची तब्बल 24 पदे रिक्त आहेत. तालुका वैद्यकिय अधिकाऱ्यांची 9 पदे भरली नाहीत. खालापूरमधील तालुका अधिकाऱ्यांचे पद 2014 पासून, श्रीवर्धनमधील वैद्यकिय अधिकाऱ्याचे 2017, अलिबागमधील 2019, मुरुड, म्हसळामधील 2021, माणगाव, रोहा, व कर्जतमधील 2023 पासून रिक्त असल्याचे समोर आले आहेत. तालुका वैद्यकिय अधिकारी नसल्याने रुग्णांना सुरळीत सेवा देण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे रुग्णांची अनेक वेळा फरफट होत आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट
जिल्हा परिषदेची इमारत जीर्ण झाल्याने आरोग्य विभागाचे कार्यालय कुंटेबाग, कर्वे रोड व जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात तीन ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील एनआरएचएम विभागाच्या कार्यालयात आरोग्य विभागाचे काही कर्मचारी आहेत. मात्र पुरेसी जागा नसल्याने काम करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम जिल्ह्यातील कामांवर होत असल्याची प्रतिक्रीया कर्मचाऱ्यांकडून होत आहे. कर्मचाऱ्यांसाठी बसण्यासाठी व्यवस्था नसल्याने प्रशासकीय कामेदेखील वेळेवर होत नसल्याचा सर्वांचाच अनुभव आहे.
जिल्हा रुग्णालयाचे रडगाणे कायमच
जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छता, बेशिस्त पार्कींग, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दुय्यम वागणूक अशा अनेक विषयांवर दैनिक कृषीवलने वेळोवेळी आवाज उठविला आहे. रुग्णालयात 18 विशेष तज्ञ डॉक्टर, व 19 वैद्यकिय अधिकारी, 7 कार्यालयीन कर्मचारी 38 तांत्रिक कर्मचारी तसेच 40 हून अधिक परिचारिकांची पदे भरलेली नाहीत. त्यामुळे रुग्णांना सेवा देताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
