टेहळणी मनोरा सडला, सागर सुरक्षा रक्षक पथक बेपत्ता
| उरण । वार्ताहर ।
नवी मुंबई, ठाणे व रायगड या तीन जिल्हयातील पर्यटकांसाठी एकमेव असलेल्या उरणच्या पिरवाडीच्या समुद्र किनार्यावरील पर्यटकांची सुरक्षा वार्यावर गेल्याचे चित्र आहे. मुरुड येथील 2017 च्या पर्यटकांच्या मृत्यू नंतर शासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एक यंत्रणा तयार केली होती, ही पर्यटक सुरक्षा यंत्रणाही मोडीत निघाली आहे. यामध्ये स्थानिकांना प्रशिक्षण देऊन पर्यटकांना सुरक्षा देण्यात येत होती. त्याचप्रमाणे पिरवाडी किनार्यावर समुद्रातील हालचाली व पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी या किनार्यावर एक टेहळणी मनोराही तयार करण्यात आला होता. या मनोर्याची दुरावस्था झाली आहे. हा लोखंडी मनोरा सडला आहे. त्यामुळे तो धोकादायक ही बनला आहे.
नागाव व केगाव या ठिकाणी समुद्र किनारे आहेत. या किनार्यावर सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उरण मधील स्थानिक नागरिक तसेच पनवेल, नवी मुंबईतील व ठाणे जिल्ह्यातील ही पर्यटक येत असतात. त्यामुळे एक एका दिवसाच्या पर्यटनासाठी हा किनारा पर्यटकांच्या पसंतीचा ठरत आहे. उरणमध्ये औद्योगिक क्षेत्रात प्रमाणे नागरीकरणात ही वाढ झाली आहे. यामध्ये सिडको कडून विकसित करण्यात येत असलेले द्रोणागिरी नोड, त्याचप्रमाणे उरण शहराच्या आसपास वाढणारी गावे व उधोगमुळे ग्रामीण भागात ही लोकवस्तीत वाढ झाली आहे. यामुळे विरंगुळा म्हणून समुद्र किनार्यावर सुट्टी घालविण्यासाठी येणार्या पर्यटकांमुळे पिरवाडी किनार्यावर मोठी गर्दी होते. यामध्ये अनेक पर्यटक समुद्रात पोहण्यासाठी उतरतात. यातील अनेकांना पोहता येत नाही. त्याच प्रमाणे समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने समुद्राच्या पाण्यात पर्यटक बुडण्याची शक्यता वाढते.