जबाबदार अधिकाऱ्यांची बैठकीला दांडी
| धाटाव | प्रतिनिधी |
महाडमधील कंपनी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशान्वये मंगळवारी धाटाव येथील आरआयएच्या सभागृहात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाची आढावा बैठक झाली. या बैठकीला प्रांताधिकारी,आरआयएचे अध्यक्ष, एमआयडीसीचे अभियंता, अनेक कंपन्यांचे अधिकारी, स्थानिक ग्रामपंचायतीच्या काही सरपंचांनी दांडी मारली होती. त्यामुळे आढावा बैठक म्हणजे निव्वळ औपचारिकता असल्याची चर्चा सभागृहात होती.
जिल्ह्यात महाड एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये अनेकदा मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये धाटाव एमआयडीसी मागे नाही. मागील पाच वर्षात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. याआधी सॉल्वे, युनिकेम, रोहा डायकेम, एक्सेल, दीपक नायट्रेड विशेषतः अँथेआमधील मोठी आग दुर्घटना अजूनही चर्चेचा विषय आहे. मागील महिन्यात रोहा डायकेम कंपनीत मोठी दुर्घटना घडली. वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांकडे एमपीसीबी, कारखाना निरीक्षक विभाग गांभीर्याने पाहत नाही. त्यातच महाडमध्ये मोठी दुर्घटना घडल्याने जिल्हा प्रशासन चांगलेच भानावर आले. याच अनुषंगाने मंगळवारी औद्योगिक सुरक्षा व औद्योगिक संचालनालयाची आढावा बैठक झाली. या बैठकीला सुरक्षा व आरोग्य विभागले उपसंचालक सुनील ठाकरे, एमपीसीबीचे राजेश ऑटी, अप्पर तहसीलदार प्रकाश मेहत्रे, नायब तहसीलदार अमृता सुतार, काही कंपन्यांचे सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.
औद्योगिक सुरक्षा व औद्योगिक विषयक बैठकीत उपस्थितांना सुनील ठाकरे यांनी अपघात व त्यावरील उपाययोजनांची माहिती दिली.बैठकीत सुरक्षा व आरोग्य बाबतचा आढावा ऐवजी प्रशिक्षण सादरीकरणाचा अंदाज आल्याने उपस्थित पत्रकारांनी जोरदार आक्षेप घेतला.कंपन्यांचे वाढते अपघात, वायू प्रदूषण त्यातच कुंडलिकेत बेसुमार सोडत असलेल्या रासायनिक विषारी पाण्याकडे संबधीत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. कुंडलिकेत दूषित रासायनिक पाणी बेधडक सोडले जात आहे. मागील आठवड्यात हजारो मासे मृत्युमुखी पडले.कुंडलिकेत दूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल उपस्थित झाला.यावर उपसंचालक सुनील ठाकरे यांनी आरोग्य व सुरक्षा विषयांवर एकत्रित काम करू,निकोप सुरक्षित वातावरणाची निर्मिती करू. यापुढे सुरक्षा व आरोग्य विषयांवर मासिक बैठक घेऊ. त्यातून निश्चित फरक दिसेल असे ठाकरे यांनी उपस्थितांना आश्वासित केले.