यात्रा आता पंधरा दिवसांची बनली
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळजवळील कोलीवली गावात पौष मासारंभाला भरली जाणारी सटुआईची यात्रा एक दिवसाची असायची. मात्र, मागील काही वर्षे या यात्रेने ट्रेंड बदललाय, कारण यात्रा आता 15 दिवसांची होऊ पाहात आहे. दरम्यान, नवस फेडायला येणारे भाविक यांच्या वर्दळीमुळे नेरळ परिसरातील व्यापार उदीम वाढला आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ जवळ असलेल्या कोलिवली गावात सटुआईचे मंदिर आहे. त्या मंदिरात दरवर्षी पौष महिन्याचे पहिल्या दिवशी यात्रा भरते. आपल्या बाळाच्या जन्माचे भविष्य सटुआई लिहिते तसेच आपल्या बाळाचे भविष्य उज्ज्वल व्हावे आणि अपत्य व्हावे म्हणून देखील विवाहित दाम्पत्य नवस करीत असतात. दरम्यान, ते नवस फेडण्यासाठी भक्त या यात्रेत मोठ्या संख्येने येत असतात. कर्जत तालुक्यातील नेरळजवळील भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी निसर्गरम्य वातावरणात असलेले जागृत देवस्थान म्हणजेच कोलीवली गावची सटूआई. मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकापासून अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावर कोलीवली गाव असून, येथे सटूआईचे जागृत देवस्थान आहे. मातेच्या पोटी जन्म घेणाऱ्या प्रत्येक बाळाचे भविष्य सटुआई लिहून ठेवत असते, अशी आख्यायिका असून त्या बाळाचे भविष्य उज्ज्वल राहावे यासाठी आणि अनेक दाम्पत्य आपल्या संतती सुख मिळावे यासाठी सटुआईला नवस करीत असतात. त्यामुळे घेतलेला नवस फेडण्यासाठी नेरळ जवळ कशेळे रस्त्यावर असलेल्या कोलीवली गावातील सटुआईच्या भेटीसाठी भाविक हजारोंच्या संख्येने येत असतात. त्या भाविकांची नवस फेडण्यासाठी गर्दी प्रामुख्याने पौष मासारंभ या दिवशी भरणाऱ्या यात्रेला होत असते.
यावर्षी रविवारी 21 डिसेंबर रोजी सटुआईची यात्रा भरली होती. त्यानंतर दररोज शेकडोंच्या संख्येने भाविक नवस फेडण्यासाठी कोलीवली गावात येत आहेत. त्यामुळे एक दिवसाच्या कोलीवली यात्रेला वेगळे रूप प्राप्त होत आहे. त्यातच यात्रेच्या वेळी आलेली खेळण्याच्या वस्तू यांची विक्री करणारी दुकाने,मिठाई ची दुकाने आजही कायम सुरू असल्याने यात्रेने आपला एक दिवसाची यात्रा हा ट्रेंड बदललाय. कोलीवली यात्रा आता 15 दिवसांची होऊ पाहात असल्याने नेरळ येथून कोलीवली येथे जाणारी प्रवासी वाहने यांचा व्यवसाय वाढला आहे. त्याचवेळी किराणा साहित्य, फळे, हार, पूजेचे साहित्य यांच्या वस्तूंची उलाढाल वाढली आहे. यात्रेने ट्रेंड बदलल्यामुळे या परिसरातील व्यापार उदीमदेखील वाढला आहे.
