| नेरळ । वार्ताहर ।
तालुक्यातील नेरळ जवळ असलेली सटूआई देवीची यात्रा आज मोठया उत्साहात पार पडली. या यात्रेत रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील हजारो भाविक यात्रेसाठी आणि आपल नवस फेडण्यासाठी आले होते. कोलीवली येथील सटूआई देवीच्या मंदिरात पौष महिन्याचे पहिल्या दिवशी यात्रा असते.सटूआईला विवाहित दाम्पत्य नवस करीत असतात आणि त्यावेळी बाळाचा जन्म झाल्यावर भाविक दांपत्य हे देवीचा नवस फेडण्यासाठी यात्रेत येत असतात. या यात्रेत देवीचा नवस फेडण्यासाठी आज 25 डिसेंबर रोजी शेकडो संख्येने भाविक कोलीवली येथे आले होते आणि त्यांनी कोलीवली, नेवाली, वाकस परिसरात शिवारात भाविकांनी लाकडी मोळ्या सोबत घेवून येत चुली मांडल्या होत्या.तर सकाळ पासून मंदिरात आपल्या बाळाला घेवून दांपत्य यांनी देवीचे समोर आपला नवस फेडण्यासाठी गर्दी केली होती.तर दुपार नंतर नव दांपत्य आपल्या बाळासाठी नवस बोलण्यासाठी देवीला साकडे घालण्यासाठी देवीच्या समोर गर्दी करून उभे होते.
देवीच्या यात्रेच्या निमित्ताने नेरळ कशेळे हा रस्ता वाहनांनी फुलून गेला होता.ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील भाविक यांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याने आज संपूर्ण परिसरात भाविक आणि त्यांची वाहने हीच दिसून येत होती.दूसरीकडे वाहनांच्या गर्दीमुळे नेरळ पोलिसांनी रस्त्यावर कोणालाही आपल्या गाड्या उभ्या करू दिल्या नाहीत.त्यामुळे रस्ता मोकळा राहिला होता,मात्र दुपारी चार पासून घरी जाण्यासाठी निघालेल्या भाविकांमुळे त्यांची वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
पौर्णिमापर्यंत भक्तांची गर्दी
गेली काही वर्षे यात्रेला होणारी गर्दी लक्षात घेवून नेरळ परिसरातील भक्त हे यात्रेला येत नाही आणि यात्रेनंतर पौष पौर्णिमा पर्यंत नवस फेडण्यासाठी येत असतात.त्यामुळे यात्रा पौर्णमेपर्यंत सुरू असते.त्या 15 दिवसांचे काळात यात्रेत भक्त देवीच्या मंदिरात येत असतात आणि नंतर सोबत आणलेले अन्न शिजवून पुन्हा घरी परतत असतात.त्यामुळे मंगळवार,बुधवार,शुक्रवार आणि रविवार या दिवशी देखील शेकडो भक्त देवीच्या दर्शनासाठी आलेले दिसून येतात.