सर्वसामान्यांचा उद्धारकर्ता

आमदार जयंतराव पाटील हे मुत्सद्दी राजकारणी, सहकारातील शिरोमणी, कष्टकरी, शेतकरी, कामगार, वंचितांचे कैवारी आहेत. ते जवळ जवळ 2002 पासून विधान परिषदेत शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आहेत. विधिमंडळात शेतकरी, कोळी समाज, वंचित बहुजन समाज, कामगार यांची पोटतिडीकीने बाजू मांडतात. अशा शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी सदैव झटणाऱ्या नेत्यास दीर्घायुष्य लाभो आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती होवो, हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा.

शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, भाताला हमीभाव, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, कामगारांचे शोषण, स्थानिकांना, भूमिपुत्रांना कंपनीत जेएसडब्ल्यूच्या नोकरी मिळण्यासाठी उपोषणे, आंदोलनाच्या माध्यमातून न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. शेतकरी, बळीराजा हा देशाचा कणा आहे. तो जगला पाहिजे, उभा राहिला पाहिजे, यासाठी भाई सरकारला धारेवर धरत असतात. एन.डी.पाटील, गणपतराव देशमुख, उद्धवराव पाटील यांसारख्या शेकापक्षाच्या शिलेदारांप्रमाणे त्यांनी लोभासाठी पक्ष सोडला नाही. अनेकवेळा आंदोलने, रास्ता रोको तसेच ‌‘धरण उशाशी, पण कोरड घशाशी; या घोषणेने भाई व त्यांच्या परिवाराने मुंबईत मंत्रालयापर्यंत दोन वेळा पेणकरांना हेटवणे धरणाचे पाणी मिळण्यासाठी चालत जाऊन आंदोलन केले. जयंत भाईंनी त्यासाठी व रस्त्यातील खड्डे बुजवण्यासाठी बरीच आंदोलने केली. भाईंच तत्त्व आहे केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे.

तत्कालिन माजी विरोधी पक्षनेने ॲड. दत्ता पाटील यांनी उरणमधील करंजा ते रेवस हा पूल होण्यासाठी त्यावेळी प्रयत्न केले होते. पण, सरकारच्या नाकर्तेपणामुळे तो सागरी पूल अजूनही पूर्ण होत नाही. येत्या 24 जुलै ते 11 ऑगस्टच्या पावसाळी अधिवेशनात भाईंनी हा प्रश्न उपस्थित करून तो तडीस नेण्यासाठी प्रयत्न करावे, अशी तमाम जनतेची कळकळीची विनंती आहे. पेण-अलिबाग रेल्वेने जोडण्यासाठी सरकारने अनेक वेळा आश्वासने दिली. पण, त्याची पूर्तता अजूनही होत नाही. भाईंनी त्यात लक्ष घालावे, अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. कारण, भाईंना एखादा प्रश्न हाती घेतला की, तो पूर्णत्वास नेल्याशिवाय ते शांत बसत नाहीत, हा आजवरचा इतिहास आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सत्ता आपल्या हाती आल्यापासून आतापर्यंत त्यामध्ये प्रगती करून त्यांनी या बँकेच्या नवीन 59 शाखा काढल्या. स्थानिकांना, कष्टकऱ्यांना बँकेत कामाला लावून त्यांना रोजीरोटी दिली. ती बिना सहकार नही उद्धार या तत्त्वानेच.

शिकाल तर टिकाल या प्रेरणेतून त्यांनी पी.एन.पी हायस्कूलच्या जवळ जवळ 25 शाखा काढून तरुण, तरुणींना नोकऱ्या दिल्या. गरीब मुलांची जवळच शिक्षणाची सोय केली. कबड्डीला प्रोत्साहन देऊन महाराष्ट्रातील कबड्डी राष्ट्रीय पातळीवरून सातासमुद्रापलीकडे नेली. विजय म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, सुधीर पाटील, महिला कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे हे सर्व कबड्डीत घडले ते पाटील घराण्याच्या श्रेयामुळे व बुवा साळवींमुळे. भाई यशस्वी उद्योगपती आहेत. भाईंनी आपला उद्योग सातासमुद्रापलीकडे नेला आहे. आज माझ्या आगरी समाजाला मुद्दामहून हिनवलं जात आहे की, या समाजामध्ये उद्योजक निर्माण होत नाही. पण, भाईंसारखा उद्योजक आज आगरी समाजाचे नाव जगाच्या पटलावर नेत आहे. त्यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.

– देविदास म्हात्रे

Exit mobile version