ग्रामस्थांच्या संघर्षानंतरही प्रशासनाची दिरंगाई; महेश पाटील यांचा आंदोलनाचा इशारा
| वावोशी | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील महत्त्वाच्या शिरवली, तळाशी ते ढेबेवाडी रस्त्याचे काम पुन्हा रखडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. तब्बल 40 वर्षांच्या संघर्षानंतर प्रथमच मंजूर झालेला हा रस्ता आजही अपूर्णावस्थेत पडून असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने रस्ते विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
शिरवली, तळाशी ते ढेबेवाडी हा रस्ता मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रशासन आणि शिरवलीचे सरपंच महेश पाटील यांना मोठा संघर्ष करावा लागला होता. रस्ता वनक्षेत्रातून जात असल्याने वनविभागाची मंजुरी मिळवण्यासाठी अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. निवेदने, बैठका आणि प्रशासनाकडे वारंवार विनंत्या करून अखेर या रस्त्याला मंजुरी मिळाली. रस्त्याचे काम रखडल्याने सरपंच महेश पाटील आणि ग्रामपंचायत प्रशासनाने महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या मुख्य कार्यकारी अभियंता डॉ. सारिका देसाई यांना गतवर्षी 3 एप्रिल, 16 एप्रिल आणि 27 ऑक्टोबर रोजी ई-मेलद्वारे निवेदने पाठवून काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती. तसेच, 12 नोव्हेंबर 2025 रोजी अलिबाग येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन डॉ. सारिका देसाई यांना कामाच्या होत असलेल्या दिरंगाईबाबत सविस्तर माहिती देत तातडीने कार्यवाही करण्यासाठी लेखी निवेदनही सादर करण्यात आले होते. परंतु, त्यानंतरही प्रत्यक्ष कामाला गती न मिळाल्याने अखेर दि.17 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचे पत्र प्रशासनाला देण्यात आले. या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने हालचाल करत काम सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र, प्रत्यक्षात काम अत्यंत संथगतीने सुरू ठेवण्यात आले. आणि आता पावसाळा तोंडावर आला असतानाच रस्ता खोदून अपूर्णावस्थेत सोडण्यात आला आहे.
सध्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती पसरलेली असून मोऱ्या, छोटे साकव आणि पाण्याच्या निचऱ्याची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होऊन वाहतुकीसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. बर्गेवाडी आणि ढेबेवाडी वस्तीच्या वरच्या भागात खोदकामातून बाहेर काढलेली माती आणि मोठमोठे दगड ढिगाऱ्याच्या स्वरूपात टाकण्यात आले आहेत. मुसळधार पावसात ही माती किंवा दगड वस्तीवर कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तसेच, खोदलेल्या रस्त्यावरील माती आजूबाजूच्या शेतांमध्ये वाहून जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास गावातील नागरिकांना पुन्हा चिखल, पाणी आणि जीवघेण्या रस्त्यावरून प्रवास करावा लागणार असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. दरम्यान, संबंधित विभाग काम पूर्ण करण्यास असमर्थ असेल, तर ग्रामपंचायत प्रशासन हे काम करण्यास सक्षम आहे, अशी स्पष्ट भूमिका सरपंच महेश पाटील यांनी प्रशासनासमोर मांडली आहे. मात्र, प्रशासनाकडून त्यालाही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासन अधिक आक्रमक झाले आहेत. रस्त्याचे काम तातडीने सुरू झाले नाही, तर आम्ही पुन्हा तीव्र आंदोलन छेडू. ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा शिरवली गावचे सरपंच महेश पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.
40 वर्षांच्या संघर्षानंतर हा रस्ता मंजूर झाला. वनविभागाची मंजुरी मिळवण्यासाठी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत प्रशासनाने मोठा लढा दिला. वारंवार निवेदने, ई-मेल आणि उपोषणाचा इशारा देऊनही प्रशासन गंभीरपणे घेत नाही. अपुर्ण कामामुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. काम तातडीने सुरू झाले नाही, तर आम्ही पुन्हा तीव्र आंदोलन छेडणार आहोत. आणि जर प्रशासनाला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून हा रस्ता पूर्ण करता येत नसेल, तर त्यांनी तसे आम्हाला स्पष्टपणे लेखी स्वरूपात कळवावे; शिरवली ग्रामपंचायत हा रस्ता पूर्ण करण्यास सक्षम आहे.
महेश पाटील,
सरपंच, शिरवली
सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. सर्वत्र मातीचे ढिगारे, अपूर्ण मोऱ्या आणि खोदकामामुळे पावसाळ्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. वस्तीच्या वर टाकलेली माती आणि दगड कोसळले तर जीवितहानी होऊ शकते. प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर परिस्थिती गंभीर बनेल.
स्थानिक ग्रामस्थ







