। अलिबाग । नेहा कवळे ।
अर्ध्यावरती सोडून गेलेला जीवनसाथी, पदरी सासू, सासरे अन दोन लहान मुले. डोळ्यासमोर अंधारच अंधार पसरलेला. पण अशा कठीण समयीही न खचता स्वत:च्या पाऊलावर उभे राहण्याची धडपड सुरु होती. अशावेळी मला साथ दिली ती शिलाई मशिनने. त्या चाकांच्या गतीने माझ्या कुटुंबाच्या जगण्याचा आधार गवसला. आज मी स्वावलंबी जीवन जगतेय याचा मला खूप आनंद होतोय. ही कहाणी आहे परिस्थितीवर मात करुन जीवनात यशस्वी झालेल्या वीणा चोगले या नवदुर्गेची.
नवरात्रौत्सवानिमित्त समाजातील विविध घटकांत काम करणार्या पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या या नवदुर्गांना प्रकाशात आणण्यासाठी कृषीवलचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.त्यातूनच आम्हाला गवसल्या वीणाताई.त्यांची कहाणीच एखाद्या चित्रपटातील कथेला साजेशी अशीच आहे.
चौल येथील रहिवासी वीणा मंगेश चोगले यांच्या पतीचे चार वर्षापूर्वी कुरुळ येथे अपघात झाला. या अपघात त्यांचे निधन झाले. आणि या माऊलीची आपल्या पिल्लांसाठीची धडपड सुरू झाली. आता प्रश्न होता तो कुटुंबाचा. पदरात दोन लहान मुले होती. सोबत सासू व सासरे. व तसा कोणताही आधार नव्हता. घरची परिस्थितीही साधारण असल्यामुळे तसेच दुसरे कोण कमविणारे नसल्याने आता आर्थिक टंचाईला सामोरे कसे जायचे. पण या सर्व परिस्थितीला न घाबरता वीणा हिने आपल्या कुटुंबाचा सांभाळ योग्य पद्धतीने करायला सुरूवात केली. त्या कुटुंबाचा कर्ता पुरूष गेल्याने त्या कुटुंबाची काय स्थिती झाली असेल हे काही सांगायला नको? पण या परिस्थितीवरही वीणा चोगले हि मात करीत आपले कुटुंब व्यवस्थितपणे सांभाळत आहे. आपल्या नवर्याची जागा ती भरून नाही काढू शकत पण आपल्या मुलांसाठी आणि सासूसाठी आता ती ठाम उभी आहे.
वीणा हीचे 12 वी पर्यंत शिक्षण झाले आहे. शिक्षण घेतानाच तिने शिवणक्लास केला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही कालावधीतच तिचा चौल येथे राहणार्या मंगेश चोगले या तरूणाबरोबर विवाह झाला. शिवणक्लास केला असल्यामुळे ती चौल परिसरातील महिलांचे डे्रस, ब्लाऊज शिवून देत असत. तेव्हा हौस म्हणून सुरू केलेला व्यवसाय पुढे जाऊन आपल्या जगण्याचा आधार होईल असे तीला वाटले सुद्धा नव्हते. पण आलेल्या परिस्थितीवर मात करून आज ती परिसरातील महिलांचे कपडे शिवून देत आपला उदरनिर्वाह करीत आहे. दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च तसेच घरखर्च ती आपल्या शिलाई मशीनमधून मिळणार्या कमाईतून भागवत आहे.
कोरोना काळात तर भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागते. तेव्हा धंदा पूर्णपणे बंद पडला होता. तरीही त्या परिस्थितीत मी हार नाही मानली. आज मी जे कष्ट करतेय त्यातून मला फार आनंद होत आहे. कुठे तरी नवर्याची उणिव भासणारच. मुलांना त्यांच्या बाबाची आठवण येणारच. परंतु या सर्वांतून बाहेर पडून मी आज स्वावलंबी जीवन जगतेय, याचा मला फार आनंद होत आहे.
वीणा चोगले,चौल