25 ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या

ग्रामीण भागाचे लागले सार्वत्रिक निवडणुकांकडे डोळे

। नेरळ । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यातील 54 ग्रामपंचायतीं पैकी तब्बल 25 ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या आहेत. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. अर्ध्या अधिक ग्रामपंचायतीमधील लोकनियुक्त प्रतिनिधी यांच्या मुदती संपल्याने त्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये आता प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे.

कर्जत तालुक्यात गाव पातळीवरील कामकाज पाहणार्‍या ग्रामपंचायतीमध्ये मागील काही महिन्यापासून प्रशासकीय राजवटी आहेत. तालुक्यातील एकूण 54 ग्रामपंचायती पैकी 25 ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक बसले आहेत. त्यामुळे स्थानिक गावातील राजकारणी यांच्यामार्फत चालवला जाणारा कारभार आता अधिकारी वर्ग पाहत आहेत. या वर्षे अखेरीस निवडणूक लागण्याची शक्यता असल्याने तालुक्यात किमान 30 ग्रामपंचायतीमध्ये एकाच वेळी सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे.

तालुक्यात डिसेंबर महिन्यात नेरळ, उमरोली, वाकस, तिवरे आणि वरई या ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सदस्यांची मुदत संपणार आहे. तर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तालुक्यातील पाथरज, शिरसे, रजपे, जामरुंग, आसल, माणगावतर्फे वरेडी, शेलू, पिंपळोली, मानिवली, पाषाणे, वारे, कशेळे, बीड बुद्रुक, सावळे हेदवली, मोग्रज, बोरिवली, अंजप, चिंचवली, भालिवडी, हालिवली, पळसदरी, ममदापुर, सावेळे, खंडापे आणि किरवली या सर्व ग्रामपंचायतच्या मुदती संपल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे. लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या होत्या. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात कदाचित राज्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कदाचित ग्रामपंचायत निवडणूक होऊ शकतात. मात्र मार्च 2023 पासून जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समितीच्या मुदती देखील संपल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका राज्य निवडणूक आयोग कधी घेणार याकडे देखील राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Exit mobile version