आठवड्यातून तीन दिवस पाणी कपात
| उरण | वार्ताहर |
रानसई धरणातील पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने उरणमध्ये मंगळवार, शुक्रवार व रविवार असे तीन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे उरणमधील नागरी वसाहतींसह औद्योगिक विभागला पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.
उरण तालुक्यात औद्योगिक क्षेत्रात वाढ झाल्याने तालुक्याची लोकसंख्या नागरीकरणामुळे वाढू लागली आहे. त्यामुळे उरणला अधिकच्या पाण्याची गरज आहे.
अशातच उरणमधील 23 ग्रामपंचायती तसेच नगरपालिकेला ही रानसई धरणातूनच पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, 60 वर्षांपूर्वी उभारलेल्या रानसई धरणात गेल्या 60 वर्षात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणी साठवणूक क्षमता फक्त 7 दशलक्ष घनमीटरवर आली आहे. त्यामुळे एकीकडे पाण्याची मागणी वाढली असताना एमआयडीसीला सिडकोच्या हेटवणे धरणातून दररोजचे दहा एमएलडी पाणी उसने घ्यावे लागत आहे. मात्र, सिडकोकडून पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने तीन दिवसाच्या पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.
नोव्हेंबरपासूनच टंचाई
रानसई धरणातील पाणीसाठा वाढवण्यासाठी धरणाची उंची वाढविण्याची गरज आहे. मात्र, उंचीचा हा प्रस्ताव दहा वर्षांपासून गुलदस्त्यात आहे. त्यामुळे उरणच्या नागरिकांना उसने पाणी व नोव्हेंबरपासूनच कपातीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. धरणाची पाणी पातळी कमी होत चालली आहे. त्यामुळेच वर्षभर पाणी पुरवठा करण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस पाणी कपात केली जात आहे.