28 पर्यंत हॉटेल फुल्ल; वाहतूक कोंडीचे सावट मात्र कायम
| रायगड | प्रतिनिधी |
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रायगड किनारपट्टी सज्ज झाली आहे. नाताळची सुटी आणि इयर एंडच्या निमित्ताने समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांचा ओघ वाढला असून, 28 डिसेंबरपर्यंत बहुतांश निवास व्यवस्था फुल्ल झाल्या आहेत. मुख्य हंगाम असलेल्या 29 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळातील हॉटेल बुकिंग अजूनही सुरु आहेत. मात्र, वाढत्या गर्दीसोबतच वाहतूक कोंडीचे संकटही गडद झाल्याने प्रशासकीय नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यावर्षीच्या पर्यटन हंगामाला निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला. ऐन दिवाळीत झालेल्या मुसळधार पावसामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. मात्र, आता पडलेली गुलाबी थंडी आणि प्रदूषणमुक्त वातावरणामुळे पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात शालेय सहली येत असून याचा स्थानिक छोट्या व्यावसायिकांना मोठा आधार मिळाला आहे.
हा ओघ जानेवारी मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. खासगी ट्रॅव्हल्सने येणाऱ्या पर्यटकांच्या गटांमध्ये मोठी वाढ झाल्याचे सुखद चित्र दिसत आहे. त्याचबरोबर एकल कुटुंबही छोट्या वाहनांमधून पर्यटनाचा आनंद लुटण्यास दाखल होत आहेत. पर्यटकांची पावले प्रामुख्याने किल्ले जंजिरा, कुलाबा किल्ला, नागाव बीच आणि काशीद बीचकडे वळत आहेत. तसेच अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, वरसोली, किहिम या किनाऱ्यांवर पॅरासेलिंग आणि बनाना राईड यांसारख्या साहसी जलक्रीडांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, वाढत्या गर्दीच्या तुलनेत स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि पार्किंग यांसारख्या मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत.
पर्यटन हंगामात वाहतूक कोंडी ही समस्या कायमच भेडसावत असते. वारंवार यासंदर्भात प्रशासनाकडून योग्य नियोजनाची गरज व्यक्त केली जाते. मात्र, याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्षच होत असल्याचे दिसते. शहरात दाखल होणारे पर्यटक हे नागाव, काशीदकडे जात असल्याने या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. यावेळी यात भर पडली आहे ती अलिबाग, मुरूड आणि रोहाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी अडथळा बनला आहे. रिणामी येत्या पाच सहा दिवसाच्या या पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावणार आहे. त्यामुळे याचे पोलीस प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्याची गरज आहे. यंदा 28 आणि 29 डिसेंबरपर्यंत बुकिंग जोरात असले तरी 31 डिसेंबर रोजी सफला एकादशी असल्याने 30 आणि 31 तारखेचे बुकिंग काहीसे मंदावले आहे. तसेच शहरात कोणत्याही मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नसल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत. मात्र, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा गर्दी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
