600 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार; 15 कोटींची निविदा निघाल्या
। मुरुड-जंजिरा । सुधीर नाझरे ।
तालुक्यातील खार आंबोली धरणाचे पाणी शेतीपर्यंत पोहोचू न शकल्याने अनेक वर्षांपासून भातशेतीव्यतिरिक्त अन्य पिके घेण्यास शेतकरी धजावत आहेत. 2014 मध्ये राज्यभर जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी करण्यात आली; परंतु आंबोली धरणावर अवलंबून उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम सात वर्षांपासून बंद पडल्याने हजारो शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळालेच नाही. पारंपरिक शेतीबरोबरच अत्याधुनिक तंत्राच्या मदतीने विविध पिके घेण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. त्यासाठी अनुदान, प्रशिक्षण, मार्गदर्शन कार्यशाळांचेही आयोजन केले जाते. शेती उत्पन्न वाढून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावा, हा त्यामागचा हेतू आहे. मात्र, गेल्या सात वर्षांपासून आंबोली धरणातील कालव्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. नुकत्याच या 15 कोटीच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्याने परिसरातील शेतकरी खुश आहे.
कालव्याचे पाणी मिळाल्यास तालुक्यातील तब्बल 600 हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याची शक्यता आहे. आंबोली धरणाचे लघुपाटबंधारे शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची प्रकल्पांतर्गत उजव्या-डाव्या तीर कालव्याचे काम जून 2015 पासून बंद आहे. धरणाची पाणी साठवणूक क्षमता मोठी आहे. कालव्याचे काम पूर्ण झाल्यास बागायती, दुग्ध व्यवसाय व कृषी पर्यटनाला चालना मिळेल. शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची संधी मिळेल आणि तालुक्याचा सरासरी आर्थिक स्तर उंचावेल, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
मुरूडसह 12 गावांना पाणी आंबोली धरण 2009 बांधण्यात आले असून, त्यासाठी सुमारे 30 कोटी रुपये खर्च करण्यात आला. स्थानिक शेतकऱ्यांना दुबार पीक घेता यावे, त्याचबरोबरच तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटावी, या उद्देशाने धरण बांधण्यात आले. मुरूडसह लगतच्या 12 गावांना धरणातून पाणी पुरवठा होतो.
जमीन ओलिताखाली येणार आंबोली धरण उजव्या तीर कालव्याचे काम 10 कि.मी. प्रस्तावित आहे. सद्यःस्थितीत 6.1 कि.मी. काम अपूर्ण आहे. तर, डाव्या तीर कालव्याचे 2.64 कि.मी. प्रस्तावित असून, 1.64 कि.मी. काम सात वर्षांपासून रखडले आहे. तालुक्यातील तब्बल 600 हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याची शक्यता आहे. परंतु, 15 कोटींची कालव्याची निविदा आहे, त्यात बंदिस्त कालवा करण्याचे ठरले असून, शेतीच्या खालून पाईप जाणार असल्याने शेतकऱ्याला जमिनीचा वापर शेतीसाठी करता येणार आहे. परंतु, कालव्यात पाईप टाकण्याचा मोबदला शेतकऱ्याला मिळणार नसल्याचे समजते. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरु होताना शेतकऱ्यांचा विरोध होण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील तब्बल 600 हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याची शक्यता आहे.आंबोली धरण 2009 बांधण्यात आले असून, त्यासाठी सुमारे 30 कोटी रुपये खर्च करण्यात आला. पूर्वी ओपन कालवा रद्द करून मोठाले पाईप टाकून जमिनीखालून कालवा काढण्याचा प्रस्ताव निर्णय येणार आहे. त्यासाठी 15 कोटी कामाच्या निविदा निघाल्यात, लवकरच काम सुरु होणार आहे. कामाचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे. कालव्याबाबत शेतकऱ्याला मोबदला मिळण्याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही.
ए.डी. रोकडे, कार्यकारी अभियंता, पेण
दुबार पीक घेता येत नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आंबोली धरणातील एकूण साठ्यापैकी 15 ते 20 टक्के पाणी पिण्यासाठी वापरले जाते. डावा तीर कालवा तेलवडे गावापर्यंत अपेक्षित असून, उजवा तीर कालवा खोकरीपर्यंत गेल्यास शेतात दुबार पीक घेता येईल. ओपन कालवा रद्द करून मोठाले पाईप टाकून जमिनीखालून कालवा काढण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. परंतु, कालव्याच्या जमीनधारकाला योग्य तो मोबदला मिळावा, अशी शेतकऱ्याची मागणी आहे.
मनोज कमाने, स्थानिक शेतकरी